एकाच दिवशी होणार दोन कोटी वृक्षलागवड
By Admin | Updated: May 24, 2016 00:42 IST2016-05-23T22:29:26+5:302016-05-24T00:42:49+5:30
१ जुलै रोजी मोहीम : शाळांचा सहभाग ठरणार महत्त्वाचा

एकाच दिवशी होणार दोन कोटी वृक्षलागवड
नाशिक : वैश्विक तपमान वाढीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आणि वृक्षसुरक्षा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून, शासनाचे विविध विभाग आणि लोकसहभागातून राज्यभर वृक्षलागवडीचा व्यापक कार्यक्रम राबविला जाणार आहे. विशेषत: शालेय शिक्षण विभाग यात अग्रेसर असून, पावसाळ्यात राबविण्यात येणाऱ्या वनमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी सुमारे दोन कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन आणि कृती आराखडा महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून केला जात आहे. शाळांच्या परिसरात सर्वात जास्त वृक्षलागवड केली जाणार आहे.
वैश्विक तपमानातील वाढ व हवामानातील बदल यांची तीव्रता व परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल, संतुलन, संवर्धन आणि सुरक्षा राखणे यासाठी वृक्षलागवडीचा कार्यक्रम शासनाच्या विविध खात्यांच्या सहभागातून राबविला जाणार आहे. त्यानुसार राज्यांतील शाळांच्या आवारात रोपांची लागवड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी, जैवविविधता, दुर्मिळ वनसंपदा त्यांचे संरक्षण, रक्षण आणि संवर्धन यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, यासाठीदेखील प्रबोधन केले जाणार आहे.
या मोहिमेत शाळांचा सहभाग सर्वांत महत्त्वाचा असून, त्या अनुषंगाने कार्यक्रमाचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. राज्यातील शाळांमध्ये भौतिक सुविधांबाबतच्या निकषांमध्ये शाळेच्या आवारात मोठ्या झाडांची लागवड सावलीसाठी करण्याचा अंतर्भाव आहे. (प्रतिनिधी)