पावसाने दडी मारल्याने अधिकारीही चिंतित
By Admin | Updated: July 2, 2014 00:27 IST2014-07-01T22:27:15+5:302014-07-02T00:27:54+5:30
पावसाने दडी मारल्याने अधिकारीही चिंतित

पावसाने दडी मारल्याने अधिकारीही चिंतित
त्र्यंबकेश्वर : पावसाळा सुरू होऊन तब्बल महिना उलटूनही पाऊस येण्याचे नाव घेत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, त्र्यंबक नगरपालिकेचे अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
बेझे धरण कार्यान्वित होईपर्यंत किमान एक वर्ष पाण्याचा त्रास त्र्यंबककरांना सहन करावा लागणार आहे. यावर्षी नमनालाच पावसाने हूल दिल्याने पाण्यासाठी हाल होत आहे. गावातील विविध नागरी वस्तीत कमी जास्त दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.
हीच परिस्थिती जिल्ह्यात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात-देखील टंचाईबाबत मिटिंग बोलविण्यात आली होती. तसेच टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार निर्मला गावित यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते आदिंची हरसूल येथे बैठक बोलविली आहे, तर त्र्यंबक नगरपालिकेनेदेखील सोमवारी (दि. ३०) एका अनौपचारिक बैठकीत त्र्यंबक नगरपालिका हद्दीत संभाव्य टंचाईसंदर्भात विचारविनिमय केला. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी सद्यस्थिती व संभाव्य टंचाई परिस्थितीची नगरसेवकांना कल्पना दिली. या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांचीही माहिती दिली. यावर नगरसेवकांनीदेखील काही आवश्यक सूचना केल्या. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिका सज्ज असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या ३१ जुलैपर्यंत अंबोली धरणात पाणी मिळेल आणि सध्याचा पाणीपुरवठा ज्या परिस्थितीत होत आहे. त्या कुठलाही फरक केला जाणार नसल्याचे नागरे व पाणीपुरवठाप्रमुख बाळासाहेब फसाळे यांनी सांगितले. म्हणूनच ग्रामीण भागासह नगरपालिका क्षेत्र, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा जणू धसका घेतला आहे. या अनौचारिक बैठकीत सुनील अडसरे, यशोदा अडसरे, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, यशवंत भोये, मनोज काण्णव, प्रशांत जुन्नरे, फसाळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)