अधिकारी, कर्मचार्यांची शर्थ मतमोजणीत अव्वल : मुदतीत निकाल
By Admin | Updated: May 17, 2014 00:41 IST2014-05-17T00:01:34+5:302014-05-17T00:41:34+5:30
नाशिक : मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण त्यापाठोपाठ मतदानप्रक्रिया ते मतमोजणी अशा जवळपास तीन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत अखेरच्या दिवशीही शासकीय यंत्रणा अव्वल ठरली. निवडणूक आयोगाने मतमोजणीचे बदललेले निकष पाहता, दुपारी चार वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहण्याची व्यक्त होणारी शंका यंत्रणेने फोल ठरवत, दुपारी साडेबारा वाजताच काम हातावेगळे करून मोकळे झाले.

अधिकारी, कर्मचार्यांची शर्थ मतमोजणीत अव्वल : मुदतीत निकाल
नाशिक : मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण त्यापाठोपाठ मतदानप्रक्रिया ते मतमोजणी अशा जवळपास तीन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत अखेरच्या दिवशीही शासकीय यंत्रणा अव्वल ठरली. निवडणूक आयोगाने मतमोजणीचे बदललेले निकष पाहता, दुपारी चार वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहण्याची व्यक्त होणारी शंका यंत्रणेने फोल ठरवत, दुपारी साडेबारा वाजताच काम हातावेगळे करून मोकळे झाले.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुमारे एक हजाराहून अधिक कर्मचारी व अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळी सहा वाजताच या कर्मचार्यांना मतमोजणी स्थळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, तर अधिकारी वर्ग पहाटे पाच वाजताच पोहोचले होते. बरोबर आठ वाजता मतमोजणी कर्मचार्यांना गोपनीयतेची शपथ दिल्यानंतर मोजणीला सुरुवात झाली. क्षणाचीही उसंत न घेता, जवळपास २२ फेर्यांची मोजणी जलदगतीने व विना अडथळा त्यांनी चार तासांत पार पाडली. विशेष म्हणजे मतमोजणी करताना मतदान यंत्रात बिघाड अथवा ते सुरू न होण्याचे प्रकार घडण्याची धास्ती घेतलेल्या यंत्रणेला अशा प्रकारे कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागले नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासूनच यंत्रणा कामाला लागली होती. मतदार याद्यांचे पुनरीक्षण, घरोघरी जाऊन मतदारांचा शोध, फोटो ओळखपत्राचे वाटप, नवीन मतदारांची नोंद यांसारख्या विविध पातळ्यांवर काम करतानाच, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याचे कामही यंत्रणेला करावे लागले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही जवळपास २३ हजार कर्मचार्यांनी लोकशाहीत आपले योगदान दिले होते. त्यानंतर मात्र मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी २२ दिवसांचा कालावधी हाती असला तरी, मतपेट्यांची सुरक्षितता, मोजणीची व्यवस्था या सार्या बाबींची पूर्तता करतानाच दररोज स्ट्रॉँग रूमला हजेरी लावण्याचा दंडकही अधिकार्यांनी पाळला.
या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी विलास पाटील, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, रघुनाथ गावडे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ, नीलेश जाधव, वासंती माळी, रत्नमाला चौरे, तहसीलदार गणेश राठोड, सुचेता भामरे आदिंनी जातीने लक्ष ठेवले. बारा वाजता मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून या अधिकार्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला व मुदतीपूर्व निवडणुकीचा निकाल लावला.