ट्रकचा क्रमांक बदलून धान्याची अफरातफर
By Admin | Updated: July 29, 2014 00:53 IST2014-07-29T00:46:06+5:302014-07-29T00:53:19+5:30
सुमारे महिनाभरापूर्वी हिंगणघाट येथून २०० सोयाबीन पोत्यांसह बेपत्ता झालेल्या ट्रकला पाच जणांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत खोट्या कागदपत्रांच्या आधारे ट्रान्सपोर्टच्या नावावर विविध

ट्रकचा क्रमांक बदलून धान्याची अफरातफर
पाच जणांची टोळी जेरबंद : हिंगणघाटातून बेपत्ता ट्रकचे प्रकरण उघड
वर्धा : सुमारे महिनाभरापूर्वी हिंगणघाट येथून २०० सोयाबीन पोत्यांसह बेपत्ता झालेल्या ट्रकला पाच जणांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत खोट्या कागदपत्रांच्या आधारे ट्रान्सपोर्टच्या नावावर विविध ठिकाणाहून धान्याची उचल करुन त्याची अफरातफर केल्या जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
चंद्रपूर, परळी वैजनाथ व खामगाव येथून धान्याची उचल करून त्याची अफरातफर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहेत.
२ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास एमएच-१८, एए-५२२८ या क्रमांकाचा ट्रक घेऊन मोहम्मद इरफान मोहम्मद करीम रा. जामा मशिदजवळ, मेहकर, जि. बुलडाणा याने हिंगणघाट येथील साईबाबा लॉरी अरेंजर्समधून सोयाबीनचे २०० पोते भरण्याबाबत बिल्टी घेतली. गुरूदेव फॅक्टरी, उबदा, ता. हिंगणघाट येथून हे सात लाख ४३ हजार ७४५ रुपये किमतीचे सोयाबीन भरले. सोयाबीन घेवून सदर ट्रक मात्र निश्चितस्थळी पोहोचलाच नाही, अशी तक्रार संजय तुलसीदास दुल्हानी (३८) रा. गुरूनानक नगर, सिंदी कॉलनी हिंगणघाट यांनी समुद्रपूर पोलिसात नोंदविली. ट्रक चालकाने दिलेले कागदपत्र, परवाना, ट्रक क्रमांक बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. जुन्या माहितीवरून वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने तपासाची सूत्रे हाती घेतली. प्राप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचे धागे चंद्रपूरशी जुळून येत होते. पोलीस पथकाने चंद्रपुरात सापळा रचला. यामध्ये शेख बशीर शेख रहमान (२८) रा. धोत्रा (मंगूजी), जि. बुलडाणा, ह. मु. नया सुमठाणा, जि. चंद्रपूर, अब्दुल शाकीर अब्दूल जाकीर (३४) रा. सतीफैल ठक्कर आॅईल मीलजवळ खामगाव, ह.मु. सुमठाणा जि. चंद्रपूर, सागर अजय साहू (२१) रा. रतनगंज, जि. अमरावती, सहजाद अहमद इकबाल अहमद (२९) रा. बालापूर नाका, हिरानगर, खामगाव व अजय चुन्नीलाल साहू (५२) रा. रतनगंज, अमरावती या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून चोरीत वापरलेला ट्रक व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सोबतच त्यांनी चंद्रपूर येथून २० टन काळी मूग, परळी बैजनाथ येथून २० टन सोयाबीन आणि जळगांव येथून १७ टन डाळ चोरी करून त्याची विल्हेवाट लावण्याची कबुली दिली आहे. या टोळीने आणखी गुन्हे केले असावे, असा पोलिसांना दाट संशय आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम. डी. चाटे, सहायक निरीक्षक व्ही. बी. नाईक, जमादार संजय गायकवाड, मनोज नांदुरकर, किशोर आप्तूरकर, अजय रिठे, कुलदीप टांकसाळे, विलास लोहकरे, अजय वानखेडे यांनी केली.(प्रतिनिधी)