रामकुंडावर नको भाविक
By Admin | Updated: August 2, 2014 01:25 IST2014-08-01T23:22:08+5:302014-08-02T01:25:20+5:30
साधू-महंतांची मागणी : मिरवणूक मार्ग करा निर्मनुष्य

रामकुंडावर नको भाविक
नाशिक : कुंभमेळा सुरू झाल्यानंतर पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते; परंतु अशी गर्दी जीवघेणी ठरू शकते याची प्रचिती गेल्याच कुंभमेळ्यात महापर्वणीच्या दिवशी आली आणि चेंगराचेंगरीच्या घटनेत भाविकांना प्राणास मुकावे लागले होते. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाविकांची गर्दीच नको, असा पवित्रा साधू-महंतांनी घेतला आहे.
कुंभमेळ्याची तयारी शासकीय- निमशासकीय यंत्रणांनी सुरू केली. त्यात साधू-महंतांचा सहभाग असावा अशी आग्रही मागणी साधू-महंतांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन अखिल भारतीय वैष्णव आखाड्याने जिल्हा प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत.
नाशिकमध्ये गेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्यामुळे शाही मार्गाचे रुंदीकरण आणि अन्य पर्याय सुचवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आखाड्यांनी सूचना केल्या आहेत. पर्वणीच्या दिवशी तपोवन ते रामकुंड अशी मिरवणूक काढण्यात येते. तथापि, या मिरवणुकीसाठी गेल्या वेळी चोख बंदोबस्त नव्हता. त्यामुळे मिरवणूक मार्गात नागरिक घुसतात. त्यातून दुर्घटना होण्याची शक्यता असते. किंबहुना गेल्या कुंभमेळ्यात दुर्घटना झाली असल्याने त्याची दखल घेऊन मिरवणूक मार्ग आणि रामकुंडापासून भाविकांना दूर ठेवावे, तसेच रामकुंडाच्या दुतर्फा असलेल्या मोठ्या पुलांजवळच ही गर्दी थोपविण्याची सूचना करण्यात आली आहे.
गेल्या कुंभमेळ्यात शाही मिरवणुकीचा परतीचा मार्ग योग्य नव्हता. त्यामुळेच १९९१ च्या धर्तीवर मिरवणूक मार्गाची व्यवस्था करावी, अशी सूचना करतानाच रामकुंड परिसरात व्हीआयपी म्हणजे महत्त्वाच्या व्यक्तींची कोणतीही व्यवस्था करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू- महंतांसाठी निवासाची योग्य व्यवस्था होणे आवश्यक आहे. २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात आखाड्यांना ५० हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर अधिक जागा २०१५ च्या मेळ्यात उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते; परंतु या जागेत अनधिकृत बांधकामे होत असून, दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढतच आहेत. येत्या कुंभमेळ्यात तीन अनि आखाडे आणि अन्य १८ आखाडे तसेच सातशे खालशांसाठी जागा उपलब्ध कशी होईल त्यादृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी भाविक येतात. अन्य धार्मिक स्थानांनादेखील ते भेटी देतात. त्याचाच विचार करता दळवळणासाठी सुविधा द्यावीच; परंतु भाविकांना ने-आण करण्यासाठी दुप्पट वाहने उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. कुंभमेळ्यात सुमारे तीन ते चार कोटी भाविक येतील, असा अनुमान आहे. त्याचा विचार करता भाविक आणि साधू-महंतांच्या दृष्टीने आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था प्रदान करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.