राष्ट्रवादीसमोर सेना, भाजपाचे कडवे आव्हान
By Admin | Updated: January 9, 2017 00:47 IST2017-01-09T00:47:13+5:302017-01-09T00:47:24+5:30
अंदरसूल गट : विधानसभा निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष

राष्ट्रवादीसमोर सेना, भाजपाचे कडवे आव्हान
प्रकाश साबरे अंदरसूल
अंदरसूल गट सर्वसाधारण झाल्याने मिनिमंत्रालयात जाणाऱ्यांची भाऊगर्दी वाढली असून, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेना व भाजपा कडवे आव्हान देण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
येवला तालुक्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीत निर्णायक व किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या अंदरसूल गटाच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद लाभलेल्या या गटात शरद पवार व छगन भुजबळ यांना मानणारा मतदारांचा वर्ग जास्त असल्याने या गटात आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले असल्याचा इतिहास आहे. भुजबळांच्या आगमनानंतर सलग पंधरा वर्षे हा गट भुजबळ समर्थकांचा बालेकिल्ला झाला आहे.
गेल्या निवडणुकीपासून अंदरसूल गटातील सायगाव गण हा नवीन झालेल्या राजापूर गटात गेला असून, नवीन नागडे गण या गटात घेतला आहे. तालुकास्तरीय नेते माजी आमदार मारुती पवार व अंबादास बनकर, माणिकराव शिंदे यांबरोबर माजी आमदार कल्याणराव पाटील या नेत्यांना कमी-जास्त प्रमाणात मानणारा वर्गदेखील आहे. जिल्हा परिषदेत या गावचे भूमिपुत्र चंद्रकला विठ्ठल थोरात, बन्शी शंकर घोडेराव, राधाकिसन मारु ती सोनवणे यांनी गटाचे नेतृत्व केले असून, सोनवणे यांना भुजबळ कृपेने लाल दिवा मिळाला होता.
अंदरसूल गट हा राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे व गावातील दोन्ही गटांचा प्रभाव असलेला असताना, गेल्या निवडणुकीत बाहेरील उमेदवार भुजबळांनी दिला तरी गटाने निवडून दिले. या गटात मराठा, माळी, धनगर, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी तसेच अठरापगड जातीचादेखील आहे. मात्र मराठा समाज निर्णायक आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे संघटन खेड्यावर व गावातदेखील दिसून येते. निवडणुकीत अंदरसूल गावात कोणता उमेदवार मतांची आघाडी घेतो यावर बरेचसे चित्र अवलंबून आहे. अंदरसूल गणात एकूण मतदार एकवीस हजार एकशे सदतीस आहेत. पंचायत समिती सदस्य म्हणून राष्ट्रवादी अर्थात शरद पवार व छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक हरिभाऊ रामभाऊ पाटील जगताप नेतृत्व करीत आहेत. नागडे गणातील पंचायत समिती सदस्य म्हणून राष्ट्रवादीच्या उंदीरवाडी येथील राधिका सचिन कळमकर नेतृत्व करीत आहेत. अंदरसूल गटातील सदस्य म्हणून राष्ट्रवादीच्या सुनीता प्रकाश चव्हाण या नेतृत्व करीत आहेत. आगामी निवडणुकीसाठी गट जनरल झाला असून, या वेळेस सुनीता चव्हाण यांना संधी मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे अंदरसूल गण ओबीसी महिला राखीव झाल्याने हरिभाऊ जगताप यांनाही संधी मिळणार नाही.
नागडे गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने राधिका कळमकर यांनादेखील या गणात संधी नसणार. गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य सुनीता चव्हाण यांनी निवडणुकीनंतर गटाशी संपर्क ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्या कालखंडात त्यांनी कोणतेही काम केले नाही. मतदारांनाच नव्हे; राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यासदेखील त्या परिचित नाहीत. केवळ भुजबळ यांच्या मी देईल तो उमेदवार निवडून द्या या गर्भीत इशाऱ्यामुळे भुजबळांच्या विकासावर गटातील सर्व उमेदवार लोकांनी निवडून दिले. मात्र गटामध्ये कोणतेही भरीव नवीन काम झाले नाही ही नागरिकांची तक्रार दिसून येते. गटातील शिक्षण आरोग्य बंधारे व विविध विकासकामेही स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व राजापूर गट जि. प. सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या माध्यमातून केली हे नाकारता येत नाही.
अंदरसूल गटात राष्ट्रवादी पक्षांतर्गत हेवेदावे व गटबाजी, श्रेयवाद यामुळे गटातील ४६ ते ५२ पाटचारी पाण्याचा प्रश्न, आरोग्य केंद्रातील औषधांचा तुटवडा, प्राथमिक मुलांच्या शाळेतील अपुरे शिक्षक व कालबाह्य इमारतीचा प्रश्न आजही आ वासून उभे आहेत. त्याचप्रमाणे सध्या नोटबंदीमुळे शेतकरी व शेतमजूर हवालदिल झाले आहेत. त्यासंदर्भात विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची बाजू घेऊन कोणताही उघड पुढाकार घेतला नसल्याचे वास्तव नजरेआड करता येणार नाही .
अंदरसूल गणातून जे निवडक कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या मिनिमंत्रालयात गेली त्यामध्ये सलग दहा वर्षे आरोग्य व शिक्षण सभापती म्हणून देवळाणे येथील रायभान पाटील काळे यान्ाां संधी मिळाली. त्यानंतर पहिल्यांदाच गटात नव्हे तर तालुक्यात भुजबळ कृपेने अंदरसूल येथील राधाकिसन सोनवणे यांना संधी मिळाली. कारण स्व. माजी आमदार जनार्धन पाटील यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली होती. अशा या अंदरसूल गटात जि. प. निवडणूक होत आहे व तीदेखील भुजबळांच्या गैरहजेरीत. त्यामुळे आता गटात राष्ट्रवादी व भुजबळ समर्थक हे गड राखू शकतात की नाही, की सत्ताधारी पक्षाला खिंडार पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अंदरसूल गण ओबीसी महिलांसाठी असल्याने व
नुकतेच येवला पंचायत समिती सभापती महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे गटातील ओबीसी
नेते कुटुंबातील महिलांना रणांगणात उतरविण्याचा घाट घालीत
आहेत.राष्ट्रवादीचे काही इच्छुक सत्ताधारी पक्षाकडे धाव घेत असल्याची चर्चा आहे. उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर तालुकास्तरीय नेत्याच्या राजकीय खेळी व धक्कातंत्राचा डाव रंगणार असल्याचे बोलले जात आहे.