निसर्गाने झोडले, प्रशासनाने नाडले!

By Admin | Updated: June 28, 2014 01:50 IST2014-06-27T21:45:41+5:302014-06-28T01:50:26+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यावर निसर्गाची जशी अवकृपा आहे तशीच प्रशासनाचीही खप्पामर्जी आहे आणि त्यामुळेच येथील जनतेला सातत्याने टाहो फोडूनही तहान भागविण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

Nature tilted, the administration nadale! | निसर्गाने झोडले, प्रशासनाने नाडले!

निसर्गाने झोडले, प्रशासनाने नाडले!

बाळासाहेब सोमासे ल्ल जळगाव नेऊर
येवला तालुक्यावर निसर्गाची जशी अवकृपा आहे तशीच प्रशासनाचीही खप्पामर्जी आहे आणि त्यामुळेच येथील जनतेला सातत्याने टाहो फोडूनही तहान भागविण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील डोंगरगाव, सावरगाव व खिर्डीसाठे या गावांना प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेचा असाच सामना करावा लागत असून, त्यामुळे येथील धरण तसेच तलावांचा डागडुजी करण्यासाठीचा ५७ लाखांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेला आहे तर उत्तर-पूर्व भागास मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील डोंगरगाव लघु तलावात येण्याची दशकानुदशके वाट पाहत आहे.
डोंगरगावी धरणाला पाझर
डोंगरगाव येथील धरणात दगडाच्या पिचिंग लेव्हलपर्यंत पाणी येताच खालच्या बाजूस पाण्याची गळती होते. त्यामुळे धरण रिकामे होते. या पाण्याची गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली नाही. गतवर्षी मेरीच्या अभियंत्यांच्या पथकाने गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पाहणी केली. मात्र कार्यवाही झालेली नाही. मांजरपाडा प्रकल्पाचे पाहणी या धरणात येण्यापूर्वी तरी गळती थांबविली जावी, अशी मागणी आहे.
सद्यस्थितीत सदर धरण सुमारे ५० टक्के गाळाने भरले आहे. त्यामुळे साठवण क्षमता घटली आहे. शासकीय पातळीवर धरणातील गाळ काढण्याची कृती होत नाही. शेतकरी स्वखर्चाने शेतात टाकण्यासाठी गाळ काढतात तेवढ्यावर धरणास जीवदान मिळते. सांडव्याची दगडी भिंत जागोजागी फुटली असून, तिची दुरुस्ती केली जात नाही.
धरणासाठी रखवालदार नियुक्त नाही. चौकीदार निवासाच्या केवळ भिंती शिल्लक असून, त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या धरणात व नदीपात्रात अनेक खासगी विहिरी असून, या कागदोपत्री खासगी क्षेत्रावर दर्शविलेल्या असल्या तरी त्या धरणक्षेत्रात व नदीपात्रात आहेत.
या विहिरींद्वारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा बेकायदा उपसा होतो. त्यामुळे धरणातील पाणी आटते. शिवाय पाणीपट्टीची आकारणी होत नसल्याने पाटबंधारे खात्याचे उत्पन्नही बुडते.
सावरगावचीही तीच तऱ्हा
सावरगाव येथे १९८५ मध्ये धरण बांधण्यात आले. या धरणातही मोठ्या प्रमाणात गाळ साठला होत्या. मागील वर्षी माजी सभापती संभाजी पवार यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी व लोकसहभागातून गाळ काढला. त्यामुळे साठवणक्षमता वाढली असली तरी खोली वाढविणे, साठवण क्षमता वाढविणे, झुडपे तोडणे यासारखे उपाय गरजेचे आहे. पावसामुळे धरणावरील मातीचे वहन होऊ नये म्हणून धरणावर मुरमाचा थर दिल्यास धरणाचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.
खिर्डीसाठेचा तलाव कोरडा
पालखेड पाटबंधारे खात्याच्या पूर्व विभागाच्या नियंत्रणाखालील खिर्डीसाठे येथे असलेल्या तलावाचा लाभ खिर्डीसाठे, नगरसूल, मातुलठाण, वडगाव, नागडे या गावांना होतो. गतसाली लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्यात आला. या धरणाची डागडूग, दुरुस्ती, गाळ काढणे, खोली वाढविणे, धरणाची उंची वाढविणे हे उपाय धरणाची साठवण क्षमता वाढवू शकते.

Web Title: Nature tilted, the administration nadale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.