सत्ता परिवर्तनात नाशिकचा हातभारं
By Admin | Updated: August 6, 2014 00:37 IST2014-08-05T21:49:52+5:302014-08-06T00:37:30+5:30
सत्ता परिवर्तनात नाशिकचा हातभारं

सत्ता परिवर्तनात नाशिकचा हातभारं
शतकातील अखेरचे दशक राज्याप्रमाणे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तनीय ठरले. त्यासाठी राज्य विधानसभेची १९९०ची निवडणूक कारणीभूत ठरली. राज्यात साहजिकच कॉँग्रेसची सत्ता आली, पण पक्षांतर्गत गटबाजीने प्रचंड उचल खाल्ली. या निवडणुकीत नाशिक मतदारसंघात तिरंगी लढत होऊन भाजपाने नाशिकची जागा राखली. १९८०च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या गणपतराव काठे यांना पक्षाने रिंगणात उतरविले. कॉँग्रेसकडून पंडितराव खैरे यांना उमेदवारी देण्यात आली. कॉँग्रेसने पक्षांतर्गत गटबाजी थोपविण्यासाठी खैरे यांना उमेदवारी दिली, तर तिसऱ्या आघाडीच्या वतीने म्हणजेच जनता दलाने समाजवादी नेते शांताराम चव्हाण यांना उभे केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत काठे यांनी बाजी मारली. कॉँग्रेसला तिसऱ्या आघाडीची उमेदवारी महागात पडली. परंतु राज्याची सत्ता राखण्यात कॉँग्रेस यशस्वी झाली. सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्यात आले आणि शरद पवार यांची रवानगी केंद्रात करण्यात आली. परंतु ‘घार उडते आकाशी’ अशा प्रकारे पवार यांचे सारे लक्ष राज्यावरच होते. अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांनी उद्ध्वस्त केल्याचा बदला म्हणून १९९२ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले व त्यापाठोपाठ जातीय दंगली उसळल्या. त्याचे लोण राज्यात पसरले. परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार कमी पडल्याची टीका झाली. एकीकडे अल्पसंख्याक समाज भयभीत झाल्याचा, तर दुसरीकडे बॉम्बस्फोट व जातीय दंगली हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा बहुसंख्य समाजाचा रोष पाहून राज्य सरकार अस्थिर झाले. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून शरद पवार यांना पुन्हा माघारी पाठविण्यात आले. प्रशासनावर त्यांची असलेली पकड पाहता वातावरण निवळले, पण याच दरम्यान, पक्षांतर्गत बंडखोरीनेही उचल खाल्ली. या साऱ्या परिस्थितीचा फायदा उचलला विरोधी पक्ष असलेल्या सेना-भाजपाने. मुंबईतील बहुसंख्य समाजाच्या संरक्षणार्थ शिवसेना रस्त्यावर उतरल्याचा प्रचार व प्रसार करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरकार विरुद्ध एल्गार पुकारला, तर भाजपाकडून गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांना टार्गेट करून ‘भूखंडाचे श्रीखंड’ यासारखे सनसनाटी आरोप करून राज्य सरकारला आरोपीच्या पिंंजऱ्यात उभे केले. पवार विरूद्ध मुंडे लढतीत मुंबई महापालिकेचे उपआयुक्त गो. रा. खैरनार यांनीही उडी घेतली. शरद पवार यांच्या विरोधात आपल्याकडे ट्रकभर पुरावे असल्याचे सांगत खैरनार यांनी विशेष करून शरद पवार यांची प्रतिमा मलीन करण्याचा पुरेपूर प्रयत्न युतीच्या पथ्थ्यावर पडला. राज्यात राजकीय परिवर्तनाचे वारे वेगाने वाहू लागले. अशातच १९९४ मध्ये शिवसेनेने नाशिकमध्ये राज्यस्तरीय शिबिर घेऊन १९९५ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. सर्वच बाजूंनी जर्जर झालेल्या कॉँग्रेसला तेवढाच धक्का पुरेसा झाला. ९५च्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्याने कॉँग्रेसला दूर लोटले. युतीच्या पंधरापैकी आठ जागा अलगद खिशात टाकल्या. कॉँग्रेसला जेमतेम जागांवर समाधान मानावे लागले. नाशिक मतदारसंघात चौरंगी लढत झाली. भाजपाकडून डॉ. दौलतराव अहेर यांनी एकतर्फी विजय खेचून आणला. यावेळी कॉँग्रेसने माजी खासदार मुरलीधर माने यांना उमेदवारी दिली. त्यांच्या खासदारकीच्या काळात केलेली कामे, जनसंपर्क अशा निकषावर माने पक्षांतर्गत विरोधकांवर मात करून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले, परंतु पुन्हा कॉँग्रेसमधील गटबाजीचा त्यांना फटका बसला. शांतारामबापू वावरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केल्याने माने यांचे मताधिक्य घटले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे देशपातळीवर गठीत करण्यात आलेल्या तिसऱ्या आघाडीत ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीला जागा वाटपात नाशिकची जागा सोडण्यात आली. सध्या भाजपात असलेले गोपाळ पाटील हे त्या पक्षाचे उमेदवार होते. अर्थातच उभी राहण्यापूर्वीच क्षीण झालेली तिसरी आघाडी काहीच करिष्मा दाखवू शकली नाही. पाटील यांना अनामत गमवावी लागली. या निवडणुकीचे आणखी दुसरे वैशिष्ट्य मोठे गमतीशीर आहे, लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांपासून मतदारसंघात केला जाणारा मराठा-मराठेतर असा जातीयवादी प्रचार लक्षात घेता, ९५च्या निवडणूक रिंगणातील चौघेही मराठा उमेदवार एकमेकांच्या विरोधात उतरले होते. (पूर्वाध)