नांदगाव बुद्रूकला रानडुकरांची शेतात धुडघूस
By Admin | Updated: September 11, 2016 00:55 IST2016-09-11T00:54:51+5:302016-09-11T00:55:17+5:30
नांदगाव बुद्रूकला रानडुकरांची शेतात धुडघूस

नांदगाव बुद्रूकला रानडुकरांची शेतात धुडघूस
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागातील नांदगाव बुद्रूक येथील ब्रिटिशकालीन दारणा धरणाजवळ बागाईत शेतात रानडुकरांच्या टोळीचा धुडघूस वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. इगतपुरीच्या वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पंधरा दिवसांपासून साकूर परिसरातून १० ते १२ रानडुकरांची टोळी दारणा धरणाजवळील बागाईत शेतात धुडघूस घालत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करीत आहेत. शेतकरी डुकरांना हाकलण्याचा प्रयत्न करीत असतात; मात्र त्यांच्यावरदेखील ही रानडुकरांची टोळी हल्ला करीत असल्याने दहशत निर्माण केली आहे. काकडी, मका, टमाटा आदी पिकांची हे डुकरे नासधूस करीत असून, शेतकरी मेटाकुटीस आला आहे. रानडुकरांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे. रात्री-अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यासही कोणी धजावत नाही. वनविभागाने या रानडुकरांच्या टोळीचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी पंडित दामू गायकर, शिवाजी देवराम पागेरे, सिद्धार्थ शिरसाठ, सुरेश गायकर, बाळू गायकर, तानाजी पागेरे आदि शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)