नामदेव हरिपाठाची ‘अशीही’ शतकपूर्ती
By Admin | Updated: July 8, 2014 01:12 IST2014-07-08T00:06:59+5:302014-07-08T01:12:51+5:30
नामदेव हरिपाठाची ‘अशीही’ शतकपूर्ती

नामदेव हरिपाठाची ‘अशीही’ शतकपूर्ती
नाशिक : संत नामदेवांच्या अभिनव हरिपाठाचे सामूहिक पठण बुधवार, दि. ९ जुलै रोजी आषाढी एकादशीला सायंकाळी ५ वाजता द्वारका परिसरातील माणेकशानगरातील लोकमान्य सभागृहात होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून दर एकादशीला होणाऱ्या सामूहिक हरिपाठाची या आषाढी एकादशीला शतकपूर्ती होणार असल्याची माहिती नामदेव भक्तिपीठाचे संस्थापक व संतसाहित्याचे अभ्यासक नंदन रहाणे यांनी दिली.
रहाणे यांनी सांगितले, मराठी भाषेत एकूण सात संतांचे हरिपाठ उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांचेच हरिपाठ जास्त प्रचारात आहेत. संत नामदेवांचा हरिपाठ हा त्यांच्या अभंगांचा असला, तरी त्याची रचना नंतर कुणीतरी केली असल्याने तो विस्कळीत व प्रभावहीन वाटतो. ही उणीव दूर व्हावी यासाठी नामदेव गाथेतल्या अभंगाचे सतत नऊ वर्षे मी परिष्करण केले व त्यातून २७ अभंगांचे एकंदर १८ संच एकामागोमाग एक तयार केले. त्यातल्या अंतिम संचाने समाधान झाले व महाराष्ट्रातील मान्यवर अभ्यासकांनीही त्याला मान्यता दिली. नामदेवांच्या या अभिनव हरिपाठाचे पहिले सामूहिक पठण सन २०१० मध्ये आषाढी एकादशीला द्वारका परिसरात करण्यात आले. तेव्हापासून गेल्या चार वर्षांत दर एकादशीला सामूहिक हरिपाठ खंड न पडता म्हटला जात आहे. या सामूहिक हरिपाठाची शतकपूर्ती येत्या ९ जुलैला आषाढी एकादशीला होत आहे. द्वारका परिसरातील लोकमान्य सभागृहात नामदेवांचा हरिपाठ १११ वेळा पठण केला जाणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशांत निरगुडे, क्षीरसागर, वसुधा बकरे व श्रीमती मानकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)