सोशल मीडियामुळे झाली मायलेकराची भेट
By Admin | Updated: July 16, 2017 01:13 IST2017-07-16T01:12:49+5:302017-07-16T01:13:03+5:30
सोशल मीडियामुळे एक मूकबधिर मुलगा आपल्या आईपासून दुरावता दुरावता वाचला. केवळ तासाभरात हा चमत्कार झाल्याने आईच्या आनंदाला पारावार उरला नाही.

सोशल मीडियामुळे झाली मायलेकराची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : सोशल मीडिया आणि त्याचे व्यसन लागलेली तरुणाई याविषयी अपवादानेच चांगले बोलले जाते. मात्र याच सोशल मीडियामुळे मोठे कामही किती सोपे होऊन जाते, याचा प्रत्यय गुरुवारी (दि.१३) सटाणा शहरात आला. सोशल मीडियामुळे एक मूकबधिर मुलगा आपल्या आईपासून दुरावता दुरावता वाचला. केवळ तासाभरात हा चमत्कार झाल्याने आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. तालुक्यातील नीरपूर येथील जयश्री दौलत सूर्यवंशी मुलगा ऋषिकेश (९) यास दुपारच्या सुमारास शहरातील एका खासगी रु ग्णालयात उपचारासाठी घेऊन आल्या होत्या. त्यावेळी तळमजल्यावर नावनोंदणी करताना गर्दीत नकळत मुलगा त्यांच्या जवळून निघून गेला. जयश्री यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. मुलगा हरवला या भीतीने त्या हवालदिल झाल्या. जवळपासच्या युवकांनी जयश्रींची अव्यस्थता पाहिली. त्यांनी विचारणा केली असता सूर्यवंशी त्यांनी घडलेली घटना कथन केली. तत्काळ त्या युवकांनी ऋषिकेशचा अपंगत्वाच्या ओळखपत्राचे फोटो काढून सदर मुलगा हरवला असून, दिसल्यास संबंधित ठिकाणी संपर्क करण्याची पोस्ट व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केली. त्या मुलाशी थेट संबंध नसताना किंवा अधिक माहिती नसतानाही शहरातील असंख्य नेटिझन्सनी सामाजिक भावनेतून अल्पावधीत ही पोस्ट व्हायरल केली. याची परिणती म्हणून तो मुलगा घटनास्थळापासून भाक्षीरोड येथे नववसाहतीत मिळून आला. आईपासून दुरावल्याने भांबावून गेलेल्या ऋषिकेशला भूषण सूर्यवंशी नामक युवकाने घरी नेऊन जेवन दिले. विचारपूस केली. मात्र, त्याला बोलता येत नसल्याने पुढील प्रश्न अवघड होता. त्याचवेळी भूषणने व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज पाहिला तर तो त्याने लगेच रिप्लाय देत मुलगा आपल्याला सुखरूप असल्याचे सांगितले.एकीकडे हे होत असताना मुलगा हरविल्याची फिर्याद दाखल करण्यासाठी त्याच्या आईने पोलीस स्टेशन गाठले होते. आवाहनानुसार ऋषिकेशला रुग्णालयाजवळ आणण्यात आले. हे समजताच आईने क्षणाची उसंत न घेता आपल्या लेकराकडे धाव घेतली.