पाण्यासाठी नगरसूलवासीय रस्त्यावर
By Admin | Updated: April 12, 2016 00:30 IST2016-04-11T22:58:22+5:302016-04-12T00:30:17+5:30
रास्ता रोको : चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

पाण्यासाठी नगरसूलवासीय रस्त्यावर
येवला : नगरसूलकरांचा घसा कोरडा पडला असून, जनावरांना चारा नाही, पाणी टँकरची वारंवार मागणी करूनदेखील टँकर मिळत नाही या यामुळे संतप्त ग्रामस्थांनी येवला -नांदगाव रस्त्यावर सुमारे तासभर रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक खोळंबली. मंडळ अधिकारी अशोक पगारे, तलाठी पिंपळसे यांनी आंदोलन-कर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. आंदोलनाचे नेतृत्व सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल यांनी केले. या रास्ता रोकोत नगरसूल परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ५०० ग्रामस्थ सहभागी झाले होते.
सोमवारी सकाळी १० वाजता आंदोलनकर्ते नगरसूल फाट्यावर आले व रास्ता रोको सुरू केला. यावेळी सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल यांनी भाषणाच्या सुरात येवला तहसील पाणीपुरवठा विभागातून नगरसूल येथील सात वाड्या व १४ वस्त्यांवर एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु हा टँकर एका वस्तीवर गेल्यानंतर तेथेच त्याचे पाणी संपत असल्याने दररोज एकाच वस्तीवर पाणीपुरवठा होत असून, इतर वाड्या-वस्त्या पाण्याअभावी तहानलेल्याच राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र टँकर सुरू करण्यात यावा. पाण्याची मागणी मान्य झाली नाही तर आपण वांरवार आंदोलन करून मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. गोविंद धनवटे, विलास बारे, मनोहर वानखेडे, संदीप कुडके, सीताराम पैठणकर, यशोदा पैठणकर आदिंनी ३८ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे ४ दिवसाआड पाणी द्यावे, चारा छावण्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)