मुंबई, पुण्याला पसंती : दिवसभरात केवळ शंभर विद्यार्थ्यांची नोंद‘
By Admin | Updated: July 31, 2014 00:55 IST2014-07-31T00:24:02+5:302014-07-31T00:55:06+5:30
एमबीए’च्या समुपदेशनाकडे पाठ

मुंबई, पुण्याला पसंती : दिवसभरात केवळ शंभर विद्यार्थ्यांची नोंद‘
नाशिक : पदवी शिक्षणानंतर प्रथम वर्ष एमबीए, एमएमएस यांसह अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी आज घेण्यात आलेल्या समुपदेशन फेरीकडे (कौन्सिलिंग राउंड) विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यामुळे दिवसअखेर केवळ शंभर विद्यार्थ्यांचीच नोंद झाली आहे.
राज्यातील सहा केंद्रांपैकी नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी समुपदेशन फेरी घेण्यात आली. मात्र दिवसभरात केवळ १०० विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली. त्यातील १६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यास नकार दिला, तर १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. मात्र या १३ विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी मुंबई येथील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने नाशिकमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. नाशिकमध्ये एमबीए अभ्यासक्र माची सुविधा पंधरा महाविद्यालयांमध्ये असून, जवळपास दीड हजार जागा आहेत. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपर्यंत जवळपास साडेतीन ते चार हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येत होते. परंतु एमबीएमधील करिअरच्या संधीचा विचार करता विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत असल्याने निम्म्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिकसह नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई या सहा केंद्रांमध्ये दहा हजार पाचशे पात्र उमेदवारांसाठी उद्या (दि. ३१) समुपदेशन फेरी घेण्यात येणार
आहे. राज्यात एमबीएकरिता एकूण २० हजार जागा असून, कॅप राउंडअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार ५०० एवढी आहे. (प्रतिनिधी)