अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला मुहूर्त लागेना
By Admin | Updated: August 1, 2014 01:10 IST2014-07-31T23:29:19+5:302014-08-01T01:10:38+5:30
अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला मुहूर्त लागेना

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला मुहूर्त लागेना
नाशिक : साहित्य, कला, राजकारण आणि समाजसुधारणा अशा चौफेर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे महाराष्ट्रात उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेला आता एक वर्ष उलटून गेले तरीही अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. इतकेच नव्हे तर पुणे येथील नाट्यगृहाचे काम अपूर्णावस्थेत आहे.
येत्या १ आॅगस्टला जयंतीनिमित्त तरी या कामाला मुहूर्त लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुमारे नऊ दशकांपूर्वी तत्कालीन समाजजीवनात अत्यंत कनिष्ठ आणि मागास मानल्या जाणाऱ्या मातंग समाजात जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी कलेचा झेंडा राज्य आणि देशातच नव्हे, तर परदेशात म्हणजे रशियात जाऊन फडकविला. सुमारे सहा डझन (७२) पुस्तके लिहिणाऱ्या अण्णा भाऊंनी डाव्या आघाड्यांच्या कामगार चळवळीत मोठे योगदान दिले. किंबहुना कार्ल मार्क्सच्या विचारांचे ते खंदे पाईक होते. ‘पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर उभी नसून कामगारांच्या हातावर आणि शेतकरी, शेतमजूर कष्टकरी यांच्या श्रमावर उभी आहे.’ असे विचार मांडणाऱ्या अण्णा भाऊंची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. केवळ जिवंतपणीच नव्हे, तर मृत्यूनंतरही त्यांच्या कार्याची दखल कोणाला घ्यावीशी वाटली नाही, अशी खंत लोकसाहित्याचे अभ्यासक व शाहिरांनी व्यक्त केली.
अनेक वाद्य वाजविण्यात अवगत असलेल्या भाऊंनी लोकनाट्य या लोककलेला समाजप्रबोधनाचे साधन बनविले. त्यांच्या कांदबऱ्यांवर अनेक चित्रपटही निघाले. नुकतीच दि. १८ जुलैला त्यांची पुण्यतिथी होती. या दिवशी नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद आदि शहरात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून फक्त फोटो काढून घेण्याचे कार्यक्रम झाले. मागील वर्षी याच काळात अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथे उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील वर्षी दि. १ आॅगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमप्रसंगी केली होती.
परंतु त्या घोषणेनंतर पुढे काहीही झाले नाही. इतकेच नव्हे, तर पुणे येथे बिबवेवाडी परिसरात १९ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेले अण्णा भाऊ साठे नावाचे नाट्यगृहाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. याप्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती; परंतु या मागणीची अद्यापही दखल घेतली गेली नाही, अशी खंत समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.