मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण
By Admin | Updated: November 17, 2014 00:40 IST2014-11-17T00:40:03+5:302014-11-17T00:40:33+5:30
मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण

मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण
नाशिक : केंद्रात आता परिवर्तन होऊन अच्छे दिन आले आहेत, तर केंद्र सरकारने गोरक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करून त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी आणि गोहत्त्येसाठी मृत्युदंडाची शिक्षा मिळावी यासाठी कायदा बनवावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला यांनी मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी बोलताना केली.शंकराचार्य संकुलात पुणे येथील गो-विज्ञान संशोधन संस्था आणि नाशिकचे श्री शंकराचार्य न्यास यांच्या वतीने आयोजित समारंभात राष्ट्रीय पुरस्कार उत्तरांचलातील पंडित गोविंद वल्लभ पंत विद्यापीठातील प्रा. डॉ. रामस्वरूप सिंह चौहान, क्षेत्रीय पुरस्कार मालेगाव येथील अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघाचे अध्यक्ष केसरीमल मेहता यांना प्रदान करण्यात आला, तर स्थानिक गोपालक पुरस्कार जिल्ह्यातील आधारवड येथील काशीनाथ व त्र्यंबक वाघमारे, गोरक्षक पुरस्कार पिंपळगाव येथील संजय सोनवणे आणि सेंद्रिय शेतीबद्दल पुरस्कार खोडीपाडा येथील सम्राट राऊत तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार मोगरे (ता. इगतपुरी) येथील पांडुरंग जाखोरे यांना प्रदान करण्यात आला. हुकूमचंद सावला, रा. स्व. संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख भाऊराव पाटील, उद्योजक देवकिसन सारडा आणि बांधकाम व्यावसायिक नेमीचंद पोद्दार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी हुकूमचंद सावला यांनी सांगितले, गाय ही बिचारी नव्हे तर सामर्थ्यशाली आहे आणि सर्व समस्यांचे निदान आहे. शास्त्र, वेदांमध्ये गायीला अद्भुत जीव म्हटले आहे. गाय हीच माणसाला तारणार असून, सकारात्मक विचार आचरणात आणण्याचे आवाहनही सावला यांनी केले. भाऊराव पाटील यांनी मोरोपंत यांच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले, मोरोपंत हे कल्पक व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम लोकसंग्राहक होते. गायीमधील विज्ञान त्यांनी लोकांना समजून सांगितले. गायीच्या आधारावरच हिंदुत्वाचे रक्षण व जागरण होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त केशरीमल मेहता यांनी पंचगव्यात औषधी गुणधर्म असल्याचे सांगत बलसाडजवळ उभारण्यात आलेल्या रुग्णालयात विनामूल्य उपचार केले जात असल्याचे सांगितले, तर प्रा. रामस्वरूप सिंह चौहान यांनी सांगितले, पिकांवर मारण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम जाणवत आहेत. गोमूत्राने रोगप्रतिकार शक्ती वाढते, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. देशी गायींवर संशोधनासाठी स्वतंत्र संस्थेची गरज असल्याचेही चौहान यांनी सांगितले.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय पांडुरंग भरीत, रघुवीर पाटसकर, मिलिंद देवल, रमेश कर्पे व राजेंद्र्र लुंकड यांनी करून दिला. सूत्रसंचालन बापू कुलकर्णी यांनी केले. व्यासपीठावर दादरा नगर हवेली मुक्तिसंग्राम समितीचे सचिव वसंतराव प्रसादे व शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल उपस्थित होते. (प्रतिनिधी)