साकोऱ्यातील मोरखडी बंधारा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:51+5:302021-09-09T04:18:51+5:30
* पोल्ट्रीत पाणी घुसल्याने ७ हजार पक्षी आणि १० शेळ्या गतप्राण, सन २०११ नंतर दुसरा महापूर * रस्ता खचल्याने ...

साकोऱ्यातील मोरखडी बंधारा फुटला
* पोल्ट्रीत पाणी घुसल्याने ७ हजार पक्षी आणि १० शेळ्या गतप्राण, सन २०११ नंतर दुसरा महापूर
* रस्ता खचल्याने १५ गावांचा नांदगावशी संपर्क तुटला, रात्रीपासून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प, लाखोंचे नुकसान
साकोरा : नांदगाव तालुक्यात दोन दिवसांपासून संततधारेमुळे नदी-नाले एक झाले. नांदगाव-साकोरा रस्त्यावर असलेल्या मोरखडी बंधाऱ्यात पाणी ओहरफ्लो झाल्याने, तसेच अवघ्या चार महिन्यांपूर्वी सा.बां. विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बंधारा फुटल्याने हजारो एकर उभ्या पिकांच्या शेतजमिनीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या पोल्ट्रीत पाणी शिरल्याने पक्षी, तसेच शेळ्यांचा जीव गेला आहे, तसेच या पाण्यामुळे रस्ता खचल्याने या भागातील एकूण १५ गावांचा नांदगावशी संपर्क तुटल्याने रात्रीपासून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.
साकोरा-नांदगाव रस्त्यावर गेल्या चार महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ठेकेदारी पद्धतीत रस्ता रुंदीकरणाचे काम झाले. मात्र, आज बंधारा फुटला. त्याच जागेवर संबंधित ठेकेदाराने आणि पाटबंधारे विभागाने यांच्या सुविचाराने मोठी मोरी टाकून भर टाकली असती तर आज बंधारा फुटला नसता असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. या कामात रस्ता कामासाठी सरळ जेसीबीने बंधाराच कोरल्याने खालचा भाग पोकळ झाला, भराव खचल्याने चक्क रस्त्यावर पाणी येऊन रस्ता खचला आणि काल रात्री अचानक बंधारा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने सां.बा. खाते ठेकेदार आणि पाटबंधारे विभाग यांच्यावर कारवाई करण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
--------------------------
सहा घरे पूर्ण पाण्याखाली
सदर बंधारा फुटल्याने या रस्त्यालगतच्या सुरसे कुटुंबातील सहा घरे पूर्ण पाण्यात सापडले असून, कांद्याचे चाळीचे, पोल्ट्रीचे, पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तसेच मधुकर पवार यांच्या शेळींच्या सपरात पाणी शिरल्याने दहा शेळ्या मरण पावल्या. कांद्याच्या चाळीत पाणी घुसले असून, परिसरातील शिवाजी बोरसे, देवचंद बोरसे, शिवा बोरसे, संजय वाघ, सर्जेराव छत्रे अशा अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शाकंभरी नदी तीरावरील संजय बोरसे यांच्या पोल्ट्रीत अचानक पाणी शिरल्याने तत्पर पाच हजार पक्षी वाचविण्यात बोरसे यांना यश आले; परंतु सात हजार पक्षी संपूर्ण पाण्यात बुडाल्याने मृत झाल्याने बोरसे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
-------------------------------
पाणीच पाणी चोहीकडे
सन १९७२ या दुष्काळी काळात सदर जागेवर अगदी दगड-मातीत सुरू करण्यात आलेले मोरखडी बंधाऱ्याचे काम १९७४ मध्ये पूर्ण करण्यात आले होते. मात्र, १९७८ ला या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले होते. या बंधाऱ्याच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांची शेती सुजलाम होती. मात्र, गेल्या चार महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सदर बंधारा संबंधित विभागाने फोडला असा आरोप अनेक शेतकरी करू लागले आहेत. बुधवारी रात्री अचानक फुटलेल्या बंधाऱ्यामुळे नांदगाव रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, संपूर्ण रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने रस्ता गायब झाला असून, या भागातील १५ गावांचा नांदगावशी संपर्क तुटला असून, दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने त्वरित रस्त्याचे काम करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी केली आहे. (०८ साकोरा,१,२)