महावितरणच्या निषेधार्थ ढोल-ताशा वाजवून मोर्चा
By Admin | Updated: September 10, 2016 00:28 IST2016-09-10T00:26:55+5:302016-09-10T00:28:36+5:30
आश्वासन : गणेशोत्सवात गणेशभक्तांना अखंड वीजपुरवठा

महावितरणच्या निषेधार्थ ढोल-ताशा वाजवून मोर्चा
लासलगाव : सततच्या अखंडित वीजपुरवठ्यामुळे पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील गणेश मंडळांनी महावितरणच्या निषेधार्थ शहरातून ढोल-ताशाच्या गजरात मोर्चा काढून महावितरणचे सहायक अभियंता यांना निवेदन दिले. महावितरणचे सहायक अभियंता आर. एस. चव्हाण यांनी अखंडित वीजपुरवठ्यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा गणेशोत्सवात सुरळीत करून गणेशभक्तांना अखंड वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लासलगाव शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐन सणासुदीच्या काळात तरी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी गणेशभक्तांनी केली. महावितरणचे कर्मचारी हलगर्जी करत असल्यामुळे दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडीत होत आहे. यातून महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला असून, गणेशोत्सवात बालगोपाल, तरु णाई, अबालवृद्ध यांच्यात उत्साह असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने त्यांच्या उत्साहात विरजण पडत आहे.विजेचा नाहक फटका गणेश भक्तांना व बकरी ईद साजरी करण्यांना सहन करावा लागत आहे. वीज देयके वसुलीप्रमाणे सेवा देण्यास कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वरिष्ठांनी चाप लावावा. आणि
सण उत्सवावर येणारे महावितरणचे
संकट दूर करावे, अशी
मागणी गणेशभक्तांमधून जोर धरत आहे.
यावेळी मोर्चकरांनी अनेक तक्रारींचा पाढा वाचला. यामध्ये सडलेले विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रान्सफार्मर यासह अनेक तक्र ारी यावेळी करण्यात आल्या. यावेळी लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व महावितरणचे सहायक अभियंता आर. एस. चव्हाण यांनी लवकरात लवकर गैरसोयींवर तोडगा काढण्यात येईल, असे मोर्चेकरांना आश्वासन दिले. वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा सुरळीत करून गणेशोत्सवात गणेशभक्तांना विनाखंड वीजपुरवठा करण्यात येईल, असेही आश्वासन दिले.
परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांनी वेठीस धरू नये अन्यथा महावितरणला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील व गणेशभक्तांनी दिला. यावेळी भय्या भंडारी, सुरज नाईक, गणेश इंगळे, दत्ता पाटील, राजू कराड, अभिजित जाधव, सचिन जैन, शोभराज बागमार, अश्विन शिंदे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)