महाराष्ट्राला कंगाल करण्याचा मोदींचा डाव

By Admin | Updated: August 13, 2014 00:43 IST2014-08-13T00:14:23+5:302014-08-13T00:43:26+5:30

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांचा आरोप

Modi's decision to pacify Maharashtra | महाराष्ट्राला कंगाल करण्याचा मोदींचा डाव

महाराष्ट्राला कंगाल करण्याचा मोदींचा डाव

नाशिक : एकेकाळी गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान राहिलेल्या मोरारजी देसाई यांनी मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला होता. आताही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई गुजरातला जोडून महाराष्ट्राला कंगाल करण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा व शहर महिला पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसने नेमकी काय भूमिका घ्यावी, पक्षाच्या योजना घराघरांत कशा पोहोचवाव्यात याबाबत मार्गदर्शन व माहिती या आढावा बैठकीत आमदार चव्हाण व प्रभारी उषाताई दराडे यांनी दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार चव्हाण यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये ५० टक्के आरक्षण देण्याबाबत आमचा पक्ष आग्रही आहे. केंद्रात मुलायमसिंह व लालूप्रसाद यादव यांनी विरोध केल्यामुळे महिलांना संसदेत ५० टक्के आरक्षणाचा कायदा कॉँग्रेसप्रणीत आघाडी सरकारला संमत करता आला नाही. आता मात्र मोदी सरकारकडे बहुमत असल्याने त्यांनी हा कायदा तातडीने संमत करून घ्यावा, असा टोमणाही त्यांनी मारला. त्याचप्रमाणे अच्छे दिन आयेंगे म्हणत लोकांना स्वप्ने दाखविणाऱ्या नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली असून, जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. मुंबईतील सर्व व्यापार गुजरातला जोडून महाराष्ट्राला कंगाल करण्याचा नरेंद्र मोदींचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आठ-दहा वर्षांपासून ब्लू प्रिंटच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढणाऱ्या आणि फिल्मी डायलॉग म्हणणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनाही जनता घरीच बसवणार आहे. कारण मुंबईत काय आणि नाशिकला काय, सेना-मनसेला सत्ता देऊन जनता कंटाळली आहे, असे आमदार विद्या चव्हाण यांनी सांगितले. यावेळी रेखाताई फष्टे, शुभांगी जगताप, शोभा मगर, जि. प. सभापती अलका जाधव, सदस्य डॉ. भारती पवार, कविता कर्डक, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, छबू नागरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इन्फो..
दहीहंडीला विरोधच
न्यायालयाने बाल गोविंदांना आणि १८ वर्षांच्या आतील मुलांना गोविंदा पथकात सामील करण्यास बंदी घातली असून, महिला राष्ट्रवादी कॉँग्रेस या निर्णयाचा आदरच करते. बाल गोविंदांना दहीहंडी पथकात सामील करता कामा नये, असेही आमदार विद्या चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Modi's decision to pacify Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.