मोदी सरकारचा नाशिककरांना ठेंगा
By Admin | Updated: July 13, 2014 21:57 IST2014-07-12T00:19:15+5:302014-07-13T21:57:06+5:30
मोदी सरकारचा नाशिककरांना ठेंगा

मोदी सरकारचा नाशिककरांना ठेंगा
नाशिक : केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर महापालिकेला अच्छे दिन येणार असल्याची अपेक्षा फोल ठरली आहे. पुढील वर्षी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मोदी सरकार भरभरून निधी देणार असल्याचे भाजपाचे मुखंडच नव्हे तर अधिकारीही सांगत होते. प्रत्यक्षात कुंभमेळ्यासाठी अनुदानाची कोणतीही घोषणा न करता भाजपा सरकारने नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
यापूर्वी नाशिकमध्ये २००२-०३ मध्ये कुंभमेळा भरला तेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी सरकार होते. त्यावेळी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि ते अनुदान महापालिकेस दिले होते. त्यावेळी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मिळून जेमतेम पाचशे कोटी रुपयांचा आराखडा होता. सर्वाधिक मोठा २२५ कोटी रुपयांचा आराखडा नाशिक महापलिकेचा असल्याने सर्वाधिक निधी महापालिकेच्या वाट्याला आला होता. त्यानंतर आता संपूर्ण आराखडा २३०० कोटी रुपयांचा असून, त्यात नाशिक महापालिकेचा वाटा १०५१ कोटी रुपयांचा आहे. इतक्या मोठ्या आराखड्यासाठी राज्य शासन तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांचेच अनुदान देणार असून, उर्वरित खर्च पालिकेला करायचा आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या पालिकेला खर्च कसा करावा असा प्रश्न पडला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आल्यानंतर उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी मोदी हे नाशिकला भरीव निधी देतील असे सांगितले होते.
त्यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांची भेटही घेण्यात आली होती. परंतु गुरुवारी सादर झालेल्या अंदाजपत्रकात नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने पालिकेचा भ्रमनिरास झाला आहे. (प्रतिनिधी)