मोबाइल लोकेशनने विवाहितेचा तपास
By Admin | Updated: April 27, 2016 00:04 IST2016-04-26T23:31:43+5:302016-04-27T00:04:08+5:30
रेल्वे पोलीस : कुटुंबीयांच्या दिले ताब्यात

मोबाइल लोकेशनने विवाहितेचा तपास
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकातून पळून गेलेल्या विवाहितेला नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेऊन तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. फेसबुक आणि मोबाइल टे्रसिंगच्या साह्याने पोलिसांनी महिलेला शोधून काढले.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मिर्झापूर येथील विवाहिता मीनू प्रदीप यादव (३५), मुलगी आर्वी (५), मुलगा अवि (३) हिचे सासर-माहेर मिर्झापूर येथेच आहे. तिचा पती प्रदीप यादव हा मुंबईला नोकरी करतो. प्रदीप याने पत्नी आणि दोन्ही मुलांना मुंबईला येण्यासाठी रेल्वेचे आरक्षित तिकीट पाठविले होते. त्यानुसार सासरच्या मंडळींनी मीनू आणि तिच्या मुलांना ६ एप्रिल रोजी मुंबईला जाण्यासाठी महानगरी एक्स्प्रेसमध्ये बसवून दिले. मात्र मीनू मुंबईला न जाता ७ एप्रिल रोजी नाशिकरोड रेल्वेस्थानकावरच उतरली. इकडे महानगरी एक्स्प्रेस मुंबईला पोहचल्यानंतर पत्नी आणि मुले डब्यात नसल्याची बाब प्रदीपच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने याबाबत सहप्रवाशांना विचारणा केली असता मीनू मुलांसह नाशिकरोडलाच उतरल्याचे प्रदीपला कळले. त्यानंतर ८ एप्रिल रोजी प्रदीप यादव याने नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाणे गाठून पत्नी व मुले हरविल्याची तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक चंद्रकांत भाबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश नागरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी प्रवासादरम्यान मीनू हिला मोबाइलवर आलेले व केलेले फोन कॉल्स, फेसबुक आदिंच्या साह्याने तपासाची चक्रे फिरविली असता राजस्थानमधील झुंझूण जिल्ह्यातील राकेश मीना हा युवक मीनूच्या संपर्कात असल्याची बाब समोर आली. राकेश व त्याचा मित्र राजेश हे दोघेदेखील ७ एप्रिल रोजी नाशिकला आले असल्याची बाब तपासात उघड झाली. नाशिकहून मीनू आणि राकेश तसेच त्याचा मित्र राजेश हे राजस्थानला निघून गेले.
उपनिरीक्षक राजेश नागरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, पती प्रदीप यादव व मीनूचा भाऊ विजय यादव हे १३ एप्रिल रोजी राजस्थानमधील झुंझूण जिल्ह्यात गेल्यानंतर राकेश हा एका विवाहितेला घेऊन आल्याची बाब त्याच्या कुटुंबीयांकडून समजली. मात्र तो एक-दोन दिवस नातेवाइकांकडे राहून तेथून तो पंजाब अमृतसरला निघून गेला. पोलिसांनी झुंझूण जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी तपासचक्रे फिरवून राकेश व त्यांच्या नातेवाइकांना विश्वासात घेतले. त्यानंतर राकेश, मीनू व दोन्ही मुले पंजाबहून राजस्थानला घरी आल्यानंतर मीनूने पती प्रदीप यादव याच्यासोबत घरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी जाबजबाब घेऊन मीनू व मुलांना तिचा भाऊ विजय यादव यांच्या ताब्यात दिले. लोहमार्ग पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विवाहितेला सुखरूप शोधून काढले. मात्र कौटुुंबिक प्रश्न असल्याने सदर प्रकरण आपसात मिटविण्यात आले. (प्रतिनिधी)