कोट्यवधींची उलाढाल
By Admin | Updated: November 9, 2015 00:30 IST2015-11-09T00:29:18+5:302015-11-09T00:30:43+5:30
दिवाळी धमाका : बाजारपेठांमध्ये झुंबड, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

कोट्यवधींची उलाढाल
नाशिक : वसूबारस व धनत्रयोदशीमध्ये आलेला भाकड दिवस, रविवारची सुटी, नुकतेच झालेले पगार व बोनस असा तिहेरी योग रविवारी जुळून आला आणि शहराच्या बाजारपेठांमध्ये आज नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. रविवारी दिवसभरातच शहरात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
यंदाच्या दिवाळीवर महागाई, दुष्काळाचे सावट असले, तरी गेल्या काही दिवसांपासून शहरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. काल वसूबारस असूनही शहरातील प्रमुख रस्ते रात्रीपर्यंत गजबजून गेले होते. मेनरोडवर तर पाय ठेवण्यासही जागा नव्हती. पगार व बोनस उशिरा झाल्याने, तसेच सुटी नसल्याने बऱ्याच जणांची खरेदी रखडली होती. त्यातच वसूबारस व धनत्रयोदशी या दोन सणांच्या मध्ये आज भाकड दिवस आल्याने नागरिकांनी सकाळपासून घराबाहेर पडत मनमुराद खरेदी केली. त्यामुळे रविवार कारंजा, मेनरोड, महात्मा गांधी रोड, शालिमार, दहीपूल परिसर गर्दीने फुलून गेला होता. रेडिमेड कपडे व साड्यांच्या खरेदीचा विशेष जोर होता, तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनाही प्रचंड मागणी होती. सराफी पेढ्यांमध्ये वर्दळ दिसून येत होती. याशिवाय आकाशकंदील, पणत्या, फटाके, फराळाचे तयार पदार्थ आदिंच्या खरेदीसाठी अक्षरश: झुंबड लागल्याचे चित्र होते.
दरम्यान, रस्त्यांवर गर्दी उसळल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. दुचाकी, चारचाकी वाहने गर्दीतून काढताना नाकीनव येत होते. याचा सर्वाधिक फटका बसेसना बसत होता. निमाणी ते शालिमार हे अंतर कापताना बसेसना तब्बल अर्धा ते पाऊण तास लागत होता. (प्रतिनिधी)