मालेगाव खरिपाच्या विमा योजनेस मुदतवाढ
By Admin | Updated: August 12, 2014 02:02 IST2014-08-12T01:39:23+5:302014-08-12T02:02:34+5:30
मालेगाव खरिपाच्या विमा योजनेस मुदतवाढ

मालेगाव खरिपाच्या विमा योजनेस मुदतवाढ
मालेगाव : राज्यात उशिराने पडलेल्या पावसामुळे पेरण्यांना उशीर झाला. त्यामुळे केंद्रीय कृषी व सहकार विभागाने राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेस मुदतवाढ दिली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सर्वत्र उशिरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरण्या व भात लागवडीला उशीर झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे केंद्रशासनाने यंदा जुलैअखेर संपलेल्या विम्याची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या योजनेत कर्जदार बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे सहभागी होेऊ शकत असून, यात पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट आदि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण दिले जाते. अधिसूचित क्षेत्रात चालू हंगामाचे उत्पादन कमी झाल्यास नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी बँकेतून अंतिम मुदतीपूर्वी विमा केल्याची खात्री करून घ्यावी, तसेच रोख रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांनी १६ आॅगस्टपूर्वी जवळच्या बँकेत विम्याचा हप्ता भरावा, अधिक माहितीसाठी बँकेचे अधिकारी व कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सी. बी. कानवडे व तंत्र अधिकारी गोकुळ आहिरे यांनी केले आहे.