आनंद बोरानाशिक, दि. १० - महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर धरणाच्या आवारात पहाटसमयी स्थलांतरीत पक्ष्यांची जत्रा भरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा जून महिना उलटून देखील पुरेसा पाऊस पडलेला नाही. ग्रामीण भागात पेरण्या खोळंबल्या असून दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झालेली आहे. निसर्ग साखळीतील महत्वाचा दुवा समाजाला जाणाऱ्या पक्ष्यांकडून देखील त्यांच्या आश्चर्यकारक वागणुकीमुळे निसर्ग बदलाचे संकेत मिळत आहे. याची प्रचिती नांदूरमध्यमेश्वरमध्ये दाखल झालेल्या विविध प्रकारच्या परदेशी पक्ष्यांवरुन येत आहे. यंदा हिवाळ्यात देखील याभागात फ्लेमिंगोचे दर्शन पक्षीप्रेमींना घडणे दुर्लभ झाले होते; मात्र निसर्गाचे बदललेले चक्र व त्यामुळे पक्ष्यांवर आलेली स्थलांतराची वेळ म्हणून की काय आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी तब्बल सत्तर फ्लेमिंगोंसह अन्य पक्षीही नांदूरमध्यमेश्वरला दाखल झाल्याने हा एक अभ्यासाचा विषट ठरणार असून वन्यजिव विभागासह नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य प्रशासनाने याबाबत गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे.