सुरगाणा येथे मातंग समाज मेळावा
By Admin | Updated: January 8, 2017 00:55 IST2017-01-08T00:55:31+5:302017-01-08T00:55:44+5:30
ज्ञानेश्वर काळे : पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती सुरूच

सुरगाणा येथे मातंग समाज मेळावा
सुरगाणा : तंत्रज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागातील मातंग समाजबांधवांना पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात वणवण फिरावे लागते, हेच या समाजाचे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन मातंग समाज जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केले.
सुरगाणा येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ, तर प्रमुख अतिथी म्हणून महाबँकेचे सदाशिव पाटील, एस. सी. चव्हाण, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, नगराध्यक्ष रंजना लहरे, उपनगराध्यक्ष सचिन आहेर, नगरसेवक सुरेश गवळी, ज्ञानेश्वर कराटे, नगरसेवक शोभा पिंगळे, शेवंता वळवी, दिनकर पिंगळे, प्रकाश वळवी, शांताराम पगारे, मोहन रंजवे, सुरेश साबळे, तालुका अध्यक्ष निवृत्ती गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
काळे पुढे म्हणाले की, मागासवर्गीयांसाठी शासन विविध योजनांबाबत घोषणा करते; मात्र त्या तळागाळातील जनतेपर्यंत खरंच पोहचतात काय, हा प्रश्नच आहे.
दरम्यान, महाबँकेचे सदाशिव पाटील यांनी गुरुकुल प्रशिक्षण, व बँकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देऊन कर्जफेडीबाबतच्या काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, अशोक साळवे, शांताराम पगारे, चंद्रकांत आल्हाड यांनीही मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष रंजना लहरे यांनी मातंग समाजबांधवांची घरे त्यांच्या नावे करून देण्याबरोबरच गावाच्या संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर लाभार्थींना कर्ज प्रकरण फॉर्मचे वाटप करण्यात आले. यशवंत शिरसाठ यांनी स्त्री शिक्षणाची आस धरून मुलींना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचे आवाहन केले व ग्रामीण भागात प्रथमच आयोजित केलेला मेळावा यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)