‘माणुसकीची भिंत’ पोहोचली ग्रामीण भागात
By Admin | Updated: January 9, 2017 01:15 IST2017-01-09T01:14:56+5:302017-01-09T01:15:11+5:30
कळवण : गरजू विद्यार्थ्यांना कपड्यांसह शालेय साहित्याचे वाटप

‘माणुसकीची भिंत’ पोहोचली ग्रामीण भागात
कळवण : शहरासह इतर शहरी व ग्रामीण भागात सुरू झालेली ‘माणुसकीची भिंत’ हा लोकाभिमुख उपक्रम आता थेट शाळेपर्यंत पोहोचला आहे. शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे साहित्य पडून आहे, त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने मविप्रचे कळवण तालुका संचालक रवींद्र देवरे यांच्या प्रेरणेने बेज येथील महात्मा फुले विद्यालयाने हा उप्रकम सुरू करण्यात आला असून, त्याला विद्यार्थी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.
गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शालेय वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि ज्यांच्याकडे या वस्तू अनेक दिवसांपासून पडून आहेत त्या वस्तूंचे दान करून सत्कर्म करता यावे, या उद्देशाने सुरू केलेला ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्र म सुरू केलेला आहे. विद्यार्थी आपल्याकडील स्वेटर, कपडे, मुलांचे कपडे यांसारख्या वापरातील मात्र अनेक दिवसांपासून घरात पडून असलेल्या सुस्थितीतील वस्तू या भिंतीसमोर आणून ठेवत आहेत. ज्यांना या गोष्टीची गरज आहे, तो ती वस्तू घेऊन जातो. हा स्तुत्य उपक्र म शाळेने सरू केला असून, विद्यालयातील शिक्षकांनी हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा निर्णय घेऊन गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. विद्यालयाच्या प्रांगणातील प्रवेशद्वार नजीकच्या भिंतीला माणुसकीची भिंत म्हणून नामकरण करण्यात आले असून, ही भिंत आकर्षक पद्धतीने रंगविण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना यातील ज्या साहित्याची आवश्यकता आहे ते विद्यार्थी त्या साहित्याची शिक्षकांकडे मागणी करतात. शिक्षक त्या साहित्याची विद्यार्थ्यांना वाटणी करत असून, एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकच साहित्य हवे असल्यास पुढील आठवड्यात तसे साहित्य उपलब्ध झाल्यावर देण्याबाबत सूचित केले जाते.
विद्यालयातील शिक्षकदेखील या उपक्रमात सहभागी होत असून, विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करून या टेबलावर ठेवतात, असे विद्यालयातील उपक्रमशील प्राचार्य रौंदळ यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत आपल्याकडील वापरात नसलेले कपडे ‘भिंत माणुसकीजवळ’ ठेवून जावे आणि तिथून ज्यांना या कपड्यांची खरोखरच आवश्यकता आहे त्यांनी ते घेऊन जावेत, असे आवाहन विद्यालयातील उपशिक्षक मीरा आहेर, नितीन पाटील, जय लाडे, गुरू गावित यांनी केले आहे. एच. पी. मोरे, जे. डी बागुल, एच. एस. आहेर डी. पी. जाधव, पी. एस. पवार, भुसारे, राज सरकार, दीपक कापडणीस, कैलास हिरे, वैभव सोनवणे, देशमुख, पवार, डगळे, बागुल, भोये, आहेर, जाधव, बच्छाव, निकम आदि परिश्रम घेत आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे. एस. पवार यांच्या हस्ते व मविप्र संचालक रवींद्र देवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. (वार्ताहर)