मनमाडच्या सत्तारूढ नगरसेवकांचीच ‘दांडी’
By Admin | Updated: June 12, 2014 00:44 IST2014-06-12T00:37:06+5:302014-06-12T00:44:50+5:30
नगरसेवक अनुपस्थित राहिंल्याने कोरमअभावी आजची सभा रद्द करण्यात आली.

मनमाडच्या सत्तारूढ नगरसेवकांचीच ‘दांडी’
गिरीश जोशी
मनमाड
बहुचर्चित नवीन इमारतीतील नगरपालिका कार्यालय शहरातील जुन्या इमारतीमध्ये आणण्याबरोबरच वाढीव पाणीपट्टी दरवाढ स्थगित करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेला सत्तारूढ गटाचे एकमेव नगरसेवकवगळता अन्य सर्व सत्तारूढ नगरसेवक अनुपस्थित राहिंल्याने कोरमअभावी आजची सभा रद्द करण्यात आली.
जनतेच्या जिव्हाळ्याच्या पाणीपट्टीच्या प्रश्नावर गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांनी जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत विरोेधक नगरसेवकांनी सभात्याग केला. शहरातील नगरपालिकेचे कार्यालय शहराबाहेर आययूडीपी भागात स्थलांतरित करण्यात आले असल्याने नागरिकांना किरकोळ कामासाठी पालिकेत जाण्याकरिता रिक्षा भाड्याचा भुर्दंड सोसावा लागतो. या ठिकाणी नागरिकांना कामासाठी चकरा माराव्या लागतात. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. हे कार्यालय शहरातील जुन्या इमारतीमध्ये पुन्हा स्थलांतरित करावे यासह २० दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात असताना पाणीपट्टीत करण्यात आलेली शंभर रुपयांची दरवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करत शिवसेनेचे गटनेते संतोष बळीद यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर ठराव मांडून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.
या विषयावर आज नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली सर्र्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात हजर झाले असले तरी सभेचा सुरू होण्याचा कालावधी उलटूनही रवींद्र घोडेस्वार हे एकमेव नगरसेवकवगळता सत्तारूढ गटाचे एकही नगरसेवक सभागृहात उपस्थित नव्हते. कोरमअभावी सदरची सभा स्थगित करण्यात आली असल्याचे नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी सांगितले. पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर नगरसेवकांनी अनुपस्थित राहून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.