मनमाड : गौराई महिला मंडळाकडून आठवणीतील खेळांना उजाळा...
By Admin | Updated: August 8, 2014 00:51 IST2014-08-08T00:46:57+5:302014-08-08T00:51:13+5:30
मनमाड : गौराई महिला मंडळाकडून आठवणीतील खेळांना उजाळा...

मनमाड : गौराई महिला मंडळाकडून आठवणीतील खेळांना उजाळा...
‘खेळ मंगळागौरीचे’, जतन संस्कृतीचे !मनमाड : सध्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात पारंपरिक लोकोत्सव लोप पावत असले तरी, येथील गौराई महिला मंडळाच्या महिलांनी ‘खेळ मंगळागौरीचे’ या कार्यक्रमातून काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या आठवणीतील खेळांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या श्रावण महिंना सुरू असून, व्रतवैकल्याच्या या महिन्यात महिलावर्गाची धावपळ सुरू आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी श्रावण महिन्यातील दर मंगळवारी मंगळागैरीच्या पूजनाची गरबड सर्वत्र दिसून येते. या पूजनाचे विशेष आकर्षण म्हणजे मंगळागौरीचे खेळ होत. श्रावण महिन्याचे औचित्य साधून मनमाड येथील गौराई मंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या ‘खेळ मंगळागौरी’चे या कार्यक्रमात सासू-सुनेच्या नात्यामधील घट्ट वीण दर्शवतानाच स्त्रीभ्रूणहत्त्येसारख्या अन्य सामाजिक विषयाला हात घालून संस्कृती जोपासण्यास हातभार लावला आहे. मंगळागौर, गणेशोत्सव तसेच नवरात्रामध्ये या कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येते.
गणेशवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते. त्यानंतर घरगुती वातावरणाची पार्श्वभूमी असलेली गाणी सादर केली जातात.
किस बाई किस। दोडका किस।
दोडक्याची फोड। लागली गोड।
आणीक तोड बाई आणीक तोड।
आठूड केलं । गाठूड केलं।
सासूच्या भ्यान सांधिला ठेवलं।
आता कस करू बाई घुशीन नेलं।
अशा प्रकारे सासू-सुनेच्या नात्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या गाण्यांमधून मनोरंजन करण्यात येते.
लाट्या बाई लाट्या
चंदनी लाट्या ।
मामाने दिल्या मला ।
सारंगी पेट्या
बाई सारंगी पेट्या ।
या गाण्यांमधून माहेरच्या
नातेवाइकांप्रति असलेली स्रेहभावना दिसून येते. यावेळी गाण्यांबरोबरच लंगडी, फुगडी, होडी, जाळी, गोफ, गाठोडे अशा विविध खेळांनी कार्यक्रमाला रंगत आणली जाते. जुन्या गाण्यांना उजाळा देतानाच वयात आलेली मुलगी पहाण्याच्या कार्यक्रमाचे वर्णन करताना महिला म्हणतात -
तिखटमीठ मसाला
फोडणीचे पोहे कशाला।
पाहुणे बघण्याच्या कार्यक्रमाला
याबरोबरच अन्य सामाजिक विषयांवर कार्यक्रमातून जनजागृती करण्यात येत आहे. गौराई मंडळाच्या महिलांनी सदरचा उपक्रम राबवून आठवणीतल्या खेळांना उजाळा दिला आहे. शहरासह परिसरात सादर करण्यात येणाऱ्या या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे संयोजन जयश्री माणके या करत असून, नीलिमा धारवाडकर, गौरी अडावदकर, वैष्णवी पुरंदरे, संपदा भावे, मीनाक्षी बेंद्रे, जयश्री माणके, मोहिनी माणके, सीमा कुलकर्णी, प्रणिती चंद्रात्रे, कृपा दिंडोरकर, स्मिता कानिटकर, वृंदा शेटे, श्रावणी पुरंदरे, शलाका माणके, सई बेंद्रे यांच्यासह मंडळाच्या अन्य सदस्यांच्या सहभागातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. विकास काकडे यांनी पल्लवी मंगल कार्यालयत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित मान्यवर हरखून गेले. यावेळी डॉ. शांताराम कातकाडे, डॉ. विद्याधर मालते, आबासाहेब दिंंडोरकर, गणेश गरुड, हेमंत वाले, मीरा मालते, विनया काकडे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)