गावात कुपोषण, शहरात अतिपोषण; कोरोनाकाळात वाढले मुलांचे वजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:17+5:302021-09-04T04:18:17+5:30
नाशिक : शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुलांचे घराबाहेरचे बहुतांश खेळ यापूर्वीच बंद झालेले असल्याने ...

गावात कुपोषण, शहरात अतिपोषण; कोरोनाकाळात वाढले मुलांचे वजन!
नाशिक : शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुलांचे घराबाहेरचे बहुतांश खेळ यापूर्वीच बंद झालेले असल्याने मुले-मुली तासंतास मोबाइलवर खेळत बसल्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. शहरातील मुला-मुलींच्या वर्षभरातील नियमित वजनवाढीपेक्षा अधिकची वजनवाढ दिसून येत आहे. तर ग्रामीण भागात कामधंदा नसलेल्या पालकांच्या घरातील मुले सकस अन्नाअभावी कुपोषणाच्या समस्येने ग्रस्त आहेत.
घरातच राहून सातत्याने फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढल्याने स्थूलपणात वाढ झाल्याने अनेक मुलांची वजने वर्षभरात दहा ते बारा किलोहून अधिक वाढल्याच्या तक्रारी आहेत. अनेक घरांतील मुले तर मोबाइल हातात असल्याशिवाय जेवणदेखील करीत नाहीत, इतके मोबाइलचे व्यसन लागले आहे. तसेच घराबाहेर खेळणे, मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी कमी झाल्याने पायी चालणेदेखील जवळपास बंद झाले आहे. कोरोनापूर्वीच्या काळात अनेक घरांमध्ये मुलांना मोबाइलपासून लांब ठेवण्यात आले होते. किंवा फार तर काही वेळासाठीच मोबाइल हातात मिळत होता. त्यामुळे शाळा, क्लासेस, मैदानी खेळ त्यात मुलांना थोडेफार तरी शारीरिक श्रम, कष्ट पडत होते; पण ऑनलाइन शिक्षणामुळे ते श्रमदेखील घटल्यामुळेच वजनवाढीची समस्या दिसून येत आहे.
कोट
मैदाने आणि अन्य क्रीडा संकुलेदेखील बंद असल्याने नियमित खेळणाऱ्या मुला-मुलींनाही घरातच थांबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या फिटनेसमध्येदेखील घट झाली असून, घरीच थांबल्याने त्यांच्या वजनातही मोठी वाढ होऊ लागली आहे. मुला-मुलींच्या वजनातील वाढदेखील त्यांच्या खेळावर आणि वजनावर परिणाम करणारी ठरत आहे.
- जयंत महाजन, पालक
कोट
मुलांना खेळण्यासाठी किमान सोसायटीत किंवा घरातील हॉलमध्ये कोणताही एखादा खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे आवश्यक झाले आहे. तर ग्रामीण भागात शासनाकडून दिला जाणारा पोषक आहार पोहोचतो की नाही, त्याची खातरजमा शासनाने करणे आवश्यक आहे.
- शंकर माळोदे, पालक
कोट
आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात उच्च उष्मांकयुक्त अन्न सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पौष्टिक घटक मिळत नाहीत; मात्र शरीरावर अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढू लागते. त्याचप्रमाणे कोरोना काळातील लहान मुलांची जीवनशैलीही लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरत आहे. तर ग्रामीण भागातील बालकांना पुरेसे पोषक अन्न घटक मिळत नसल्याने त्यांच्यात कुपोषण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. सुयश नाईक, बालरोग तज्ज्ञ
ही आहेत कारणे
मुले घरात बसून मोबाइल स्क्रीनच्या आणि टीव्हीच्या संपर्कात राहू लागल्याने केवळ बसून किंवा झोपून लोळत सर्व वस्तू हाताळण्याची पडलेली सवयच स्थूलपणा वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.
मोबाइलचा वापर केवळ अभ्यासासाठी करताना अन्य वेळ मोबाइल हातात देणेच बंद केल्यास मुले किमान घरात तरी इतर खेळ खेळतील आणि त्यांच्या वजनात घट येऊ शकेल.
लहान मुलांमधला लठ्ठपणा टाळण्यासाठी सर्वप्रथम त्यांना मैदानावर खेळण्यास आणि नियमित व्यायाम करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. पोहणे आणि सायकलिंगसारखे व्यायाम निश्चितच लाभदायक ठरू शकतात.
त्याशिवाय आहारावर नियंत्रण असले पाहिजे. फास्ट फूड खाण्यावर नियंत्रण आणले पाहिजे. शीतपेय पूर्णपणे बंद करण्याबरोबरच आहार आणि निद्रा यांचा समतोल असायला हवा.