मालेगावी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार
By Admin | Updated: September 27, 2016 23:16 IST2016-09-27T23:16:02+5:302016-09-27T23:16:39+5:30
मालेगावी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

मालेगावी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार
आझादनगर : येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. विजेच्या समस्येवरून कंपनीचे अधिकारी व उद्योजक, राजकीय व्यक्ती यांच्यात शाब्दिक संघर्ष होत आहे; परंतु या संघर्षात सामान्य नागरिकांना महिनाभर अंधाराचा सामना करावा लागला आहे.
शहरातील जळालेले व बंद रोहित्र त्वरित बदलून सामान्यांची या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. मालेगाव शहर यंत्रमाग व्यवसायावर अवलंबून आहे. त्यातच या व्यवसायावर आलेल्या मंदीमुळे यंत्रमागधारक व मजूरवर्ग हवालदिल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीतून हा व्यवसाय कसाबसा मार्गक्रमण करीत असताना त्यांना महावितरणच्या भोंगळ कारभाराचाही सामना करावा लागत असल्याने यात आणखी एका समस्येची भर पडली आहे.
शहरात रौनकाबाद भागातील रोहित्र २८ आॅगस्ट रोजी जळाले. त्यामुळे या भागातील सर्व यंत्रमाग कारखाने बंद पडले आहेत. हे विद्युत रोहित्र बदलण्यासाठी परिसरातील यंत्रमागधारकांनी महावितरणकडे अनेकवेळी पाठपुरावा केला. यात महावितरण व यंत्रमागधारकांत वाद झाले. हे सर्व होत असल्याने मात्र सर्वसामान्य नागरिकांना मंदीतही आर्थिक झळ सोसावी लागली, तर परिसरातील सर्वसामान्यांना २५ दिवस अंधारात रात्र काढावी लागली. असे अनेक ठिकाणी शहरात घडत आहे.
महावितरणच्या बेशिस्त कारभार व काही आर्थिक लाभाच्या अपेक्षेमुळेही रोहित्रांचे काम जाणीवपूर्वक लांबविले जात आहे. महावितरण विभागाने या समस्येकडे त्वरित लक्ष देत शहरातील जळालेले रोहित्र त्वरित बदलावे व नागरिकांची विजेअभावी होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. (प्रतिनिधी)