मालेगावी ऐन सणासुदीत ‘अंधार’
By Admin | Updated: September 30, 2014 21:49 IST2014-09-30T21:49:00+5:302014-09-30T21:49:14+5:30
नागरीक संतप्त : दिवसभरात आठ तास विज पुरवठा खंडीत

मालेगावी ऐन सणासुदीत ‘अंधार’
मालेगाव कॅम्प : शहर व परिसरात ऐन सणासुदीच्या कालावधीत भारनियमन सुरू असल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दिवसभरात सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात कामकाज ठप्प झाले आहे. किमान दसरा-दिवाळीत तरी वीज भारनियमन रद्द करावे, अशी मागणी होत आहे.
शहरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून वीजपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. अखंडित वीजपुरवठा मिळवण्यासाठी शहरातील जनतेसह राजकीय पुढाऱ्यांनी जंग पछाडले होते. यात सर्वप्रथम शहरातील संपूर्ण भारनियमन रद्द करा, सुधारित भारनियमन करा, शहरात एकाच वेळेस सर्वत्र भारनियमन करा, यंत्रमागासाठी एक्स्प्रेस वाहिनी करून वीजपुरवठा द्या अशा विविध मागण्या लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. तसेच रमजान ईद, गणपती उत्सव, नवरात्री, दसरा आदि सणांमध्ये भारनियमन पूर्ण बंद करण्यात यावे, अशीदेखील मागणी केली होती; परंतु त्या सर्व मागण्यांना सध्या वीज कंपनीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. रमजान, गणपती उत्सव कालावधीत काही काळ अखंडित वीजपुरवठा सुरू होता; परंतु सध्या नवरात्रीचा कालावधी सुरू आहे. यात वीज कंपनीने पहिल्या माळेपासून भारनियमन सुरू केले आहे. पहाटे चार व दुपारी चार तास अशा दोन सत्रात बिनबोभाट भारनियमन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने भारनियमन समस्येकडे आंदोलकांचेही दुर्लक्ष झाले आहे.
सणासुदीच्या काळात भारनियमन होणार नाही असे वीज कंपनीने आश्वासन दिले असले तरी
भारनियमन कडेकोटपणे सुरू झाले. त्यामुळे नवरात्री व इतर महत्त्वाच्या कामांवर विरजन पडले आहे.
सायंकाळ व रात्री ९ वाजेपर्यंत
शहरात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे सणांच्या आनंदावर शहरवासीयांचा हिरमोड होत आहे. या भारनियमनाच्या समस्यावर आचारसंहिताच्या बडगा विसरून लोकप्रतिनिधींनी वीज कंपनीशी भारनियमन रद्द करण्याबाबत चर्चा करून भारनियमन रद्द करण्याची मागणी करावी, अशा भावना शहरवासीयांमध्ये व्यक्त होत
आहे. (वार्ताहर)