मालेगाव : गेल्या तीन महिन्यांत राज्यासह देशभरात झालेल्या विविध घटनांबाबत दलित समाजास न्याय मिळावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या मालेगाव शाखेतर्फे येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्यांतर्फे नायब तहसीलदार संजय तराळकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दीपक निकम यांच्या नेतृत्वाखाली मोसमपूल महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. कॅम्परस्त्याने सदर मोर्चा प्रांत कार्यालय येथे आला. नायब तहसीलदार तराळकर यांना मोर्चेकर्यांनी आपल्या मागणीचे निवेदन दिले. गेल्या काही महिन्यांत राज्यासह देशभरात दलितविरोधी काही घटना घडामोडी घडल्या. त्यात प्रामुख्याने नगर जिल्ह्यात या घटना अधिक आहेत. तेथे एका दलित तरुणाचा खून करण्यात आला, मातंग समाजातील लोकांना स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करण्यात आला. योगगुरु रामेदव बाबा यांनी आक्षेपार्ह विधान केले. तालुक्यातील हिसवाळ व दसाने येथेदेखील दलितविरोधी घटना घडल्या. या सर्व घटनांचा मोर्चेकर्यांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. तसेच असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून कठोर कायदे करावेत, नगर जिल्ह्यातील खुनाचा निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करावे आदि मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी रिपाइं (आठवले गट)चे खंडू उशिरे, शांताराम सोनवणे, दादाजी महाले, दीपक निकम, मंगेश निकम, साईनाथ निकम, राजू पवार, शक्ती सौदे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मालेगावी रिपाइंचा मोर्चां
By admin | Updated: May 9, 2014 18:30 IST