मालेगाव : येत्या १५ आॅगस्टला ठाणे जिल्ह्याचे विभाजन होत असताना नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव जिल्ह्याचीही निर्मिती व्हावी, व गेल्या ३० वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण करावी, अशी मागणी आमदार दादा भुसे यांनी विधानसभेत केली आहे.शासनाने मागील आठवड्यात येत्या १५ आॅगस्टला ठाणे जिल्हा विभाजनाचे संकेत दिले आहे. गत २५ ते ३० वर्षांपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून मालेगाव जिल्हानिर्मितीचा पाठपुरावा करण्यात येत आहे. मालेगाव जिल्हा होणे ही बाब शासकीय कामकाज व जनतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे. मालेगाव येथे सर्व खात्यांचे जिल्हा स्तरावरील अधिकारी तसेच जिल्हा सत्र न्यायालय व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यरत आहेत. फक्त जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांची नियुक्ती झाल्यास जिल्ह्याचे काम सुरू होऊ शकते. मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न अद्यापपावेतो शासनाकडून मार्गी लावलेला नाही. येत्या १५ आॅगस्टला ठाणे जिल्हा विभाजनाबरोबरच देवळा, बागलाण, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांचा समावेश करून मालेगाव जिल्हानिर्मिती करावी, अशी मागणी आमदार भुसे यांनी औचित्याचा मुद्याद्वारे आज विधानसभेत केली.
ठाणे विभाजनाबरोबरच मालेगाव जिल्हा करा
By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST