ऑनलाईन संमेलन घेऊन नाशिकचा दावाही कायम ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:01+5:302021-07-28T04:16:01+5:30

नाशिक : शहरात प्रस्तावित ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन कोरोनामुळे स्थगीत करण्यात आल्यानंतर ‘नाशिकमध्ये साहित्य संमेलन तूर्तास अशक्यच’असल्याचे ...

Maintain Nashik's claim by holding an online meeting! | ऑनलाईन संमेलन घेऊन नाशिकचा दावाही कायम ठेवा!

ऑनलाईन संमेलन घेऊन नाशिकचा दावाही कायम ठेवा!

नाशिक : शहरात प्रस्तावित ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन कोरोनामुळे स्थगीत करण्यात आल्यानंतर ‘नाशिकमध्ये साहित्य संमेलन तूर्तास अशक्यच’असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केल्यानंतर आता साहित्यक्षेत्रातील संस्थांनी यावर्षीचे संमेलन ऑनलाईन पद्धतीने घेऊन संमेलन आयोजनावर नाशिकचा दावा कायम ठेवत आगामी काळात कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर संमेलन आयोजन करण्याचा पर्याय सुचविला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नाशिकमध्ये प्रस्तावित ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत आयोजक संस्थेला सप्टेंबरपर्यंत संमेलन होणार किंवा नाही याविषयी ३१ जुलैपर्यंत जाहीर भूमिका जाहीर करावी, असे पत्र पाठविले आहे. या पत्राला उत्तर देण्यासाठी संमेलनाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या साहित्य संस्थांची संमेलन कार्यालयात मंगळवारी (दि. २७) बैठक घेण्यात आली. परंतु. या बैठकीला केवळ सहा ते सात संस्थांचेच प्रतिनिधी उपस्थितीत राहिले. तर उर्वरित संस्थांनी निमंत्रकांना त्यांचा अभिप्राय फोनवरून कळविला. यात बहुतांश प्रतिनिधींनी संमेलन आताच व्हावे, अशी मंडळाची भूमिका असेल, तर आयोजकांनी संमेलनावर नाशिकचा दावा कायम ठेवून सध्या ते ऑनलाईन पद्धतीने घ्यावे, आणि कोरोना संकट संपल्यानंतर प्रथम आयोजनाची संधी नाशिकलाच द्यावी, अशी मागणी मंडळाकडे करण्याची सूचना केली आहे. या बैठकीला संमेलनाचे निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह प्राचार्य प्रशांत पाटील, सुभाष सबनिस, श्रीकांत बेणी, विनायक रानडे, प्रा. शंकर बोऱ्हाडे, विश्वास ठाकूर, सुरेश पवार आदी उपस्थित होते. दरम्यानच्या काळात महामंडळाच्या अध्यक्षांनी नाशिकच्या प्रस्तावित साहित्य संमेलनातील कथित गैरप्रकारांबाबत वाच्यता केल्यानंतर त्याबाबत प्रदीर्घ काळ चर्चा रंगली होती. या सर्व पार्श्वभूमीवर महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी प्रमुख कार्यवाह तथा निमंत्रकांना सविस्तर पत्र पाठवून त्याद्वारे संमेलन आयोजनाच्या शक्यतेबाबत त्वरित खुलासा करण्यास सांगितले आहे.

इन्फो

ऑक्टोबरमध्ये संमेलन शक्य

नाशिक शहरातील बहुतांश साहित्यिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सद्यस्थितीत ऑनलाईन तथा डिजिटल माध्यमातून संमेलनाचे आयोजन करून कोरोना संपल्यानंतर दिमाखात साहित्य संमेलन घेण्याची सूचना केली. हाच धागा पकडून निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनीही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली नाही तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संमेलन होण्याची सकारात्मक अपेक्षा व्यक्त करतानाच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीही ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली नाही, तर सप्टेंबरमध्ये संमेलन शक्य असल्याचे सांगितल्याचेही जातेगावकर यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Maintain Nashik's claim by holding an online meeting!