मराठा समाजाचा महाकुंभ
By Admin | Updated: September 25, 2016 01:29 IST2016-09-25T01:28:30+5:302016-09-25T01:29:04+5:30
विक्रमी मोर्चा : महिला-विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग

मराठा समाजाचा महाकुंभ
नाशिक : कोणत्याही पक्ष-संघटनेच्या हाती सूत्रे नाहीत, अग्रभागी कुणी राजकीय पुढारी-नेता नाही, तरीही लाखोंच्या संख्येने एकदिलाने एकत्र आलेल्या मराठा समाजाच्या वेदनांचे तुफान नाशिककरांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजास आरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा, या प्रमुख मुद्द्यांसह वर्षानुवर्षांपासून मनामनांत साचलेला असंतोषाचा आक्रोश मौनातून प्रदर्शित करीत सकल मराठा समाजाच्या मोर्चाने आजवर राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे विक्रम मोडीत काढले. शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देणाऱ्या या मोर्चात लाखोच्या संख्येने महिला व विद्यार्थिनींचा सहभाग लक्षवेधक ठरला.
विक्रमी गर्दी
नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोर्चासाठी विक्रमी गर्दी पहायला मिळाली. पहाटे ५ वाजेपासूनच मराठा समाजाचे जत्थेच्या जत्थे तपोवनाकडे येत होते. ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेल्या वाहनतळांवरही वाहने खच्चून भरली होती. तपोवनाबरोबरच गोल्फ क्लब व इदगाह मैदानावरही तोबा गर्दी झाली होती. सकाळी १०.४० वाजता सुरू झालेल्या मोर्चाची दुपारी २.२० वाजता सांगता झाली. मूकमोर्चात सुमारे ४० लाख मराठा समाजबांधव सहभागी झाल्याचा दावा संयोजकांकडून करण्यात आला.
लक्ष्यवेधी फलक
मोर्चेकऱ्यांच्या हातात विविध घोषणांचे फलक लक्ष्यवेधी होते. त्यातून मराठा समाजच नव्हे तर सर्वांच्याच भावना प्रतित होत होत्या. अनेकांनी दंडावर काळ्या फिती बांधलेल्या तर अनेकांनी काळे टी शर्ट परिधान करत तसेच महिलांनी काळ्या साड्या परिधान करत निषेध नोंदविला. डोक्यावर ‘मी मराठा’ या पांढऱ्या टोप्याही लक्ष वेधून घेत होत्या.