हजारो लिटर पाण्याची नासाडी
By Admin | Updated: July 5, 2014 00:25 IST2014-07-04T21:52:02+5:302014-07-05T00:25:32+5:30
हजारो लिटर पाण्याची नासाडी

हजारो लिटर पाण्याची नासाडी
मालेगाव : पुरेशा पर्जन्यमानाअभावी मालेगावसह संपूर्ण राज्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना मालेगाव शहरात मात्र काही ठिकाणी जलकुंभ ओसंडून वाहत आहेत, तर काही ठिकाणी जलवाहिनींच्या गळतीद्वारे रोज हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे.
मालेगाव मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र हा पाणीपुरवठा शहरातील सर्वच विभागात समान पद्धतीने होत नाही. हद्दवाढीनंतर तर शहरात समाविष्ट भाग व पूर्वीच्या शहराच्या टोकाकडील भाग हे अद्याप पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मनपा पाणीपुरवठा व मजीप्राच्या संबंधित अधिकारी व कर्मचार वर्गाच्या हलगर्जीपणामुळे बाराही महिने येथे कुठे ना कुठे सतत पिण्याच्या हजारो लिटर पाण्याची रोज नासाडी होत असते. त्यात प्रामुख्याने गिरणा धरण, तळवाडे साठवण तलाव येथील जलवाहिनी व शहरांतर्गत ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या जलकुंभातून होणाऱ्या गळतीचा समावेश आहे. घरगुती व सार्वजनिक नळाद्वारे होणारी गळती तसेच मनपा जलकुंभातून होणारी पाणीचोरी ही वेगळीच आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वीच येथील कॅम्प रस्त्यावर अपर पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थाना-जवळ जलवाहिनीचा जोड तुुटल्याने त्यातून आठ ते दहा फूट उंच उसळी घेत तब्बल चार तास हजारो लिटर पाणी वाया गेले. त्याआधी कॅम्प टीव्ही सेंटरलगतच्या जलकुंभाच्या निकृष्ट कामामुळे या जलकुंभातूनही हजारो लिटर पाणी वाया गेले. जुना आग्रारोड, दरेगाव चौफुली, दाभाडी शिवार येथूनही वाया जाणारे पाणी दृष्टीस पडणे हे नागरिकांच्या सवयीचे झाले आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दूरध्वनी वा भ्रमणध्वनी उचलत नाहीत. त्यामुळे मनपा व मजीप्राविषयी संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे शहराबरोबर तालुक्यातील खेडोपाडीची सर्वसामान्य जनता पाण्याच्या आसूसलेली असताना मालेगाव शहरात हजारो लिटर पाण्याची अशाप्रकारे होणारी नासाडी कितपत योग्य आहे, असा सवाल सर्वसामान्य मालेगावकरांकडून केला जात आहे.