मोहर गळाल्याने हापूसला उशीर
By Admin | Updated: May 5, 2016 00:21 IST2016-05-04T23:55:41+5:302016-05-05T00:21:04+5:30
खवय्यांचा हिरमोड : दरही चढेच राहण्याची शक्यता; अक्षयतृतीयेनंतर वाढणार उलाढाल

मोहर गळाल्याने हापूसला उशीर
नाशिक : उन्हाळ्यात खवय्यांचे प्रमुख आकर्षण असलेला हापूस आंबा यंदा पहिला मोहर गळाल्याने शहरात उशिरा दाखल झाला असून, आवकेत घट झाल्याने त्याचे दरही चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हापूसचा गोडवा अनुभवण्यासाठी यंदा खिसा आणखी हलका करावा लागणार आहे.
फळांचा राजा असलेल्या आंब्यात ‘हापूस’ हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. आंबा खावा तर हापूस आणि तोही कोकणातला, अशी सर्वत्र ख्याती आहे. रत्नागिरी, देवगड येथील हापूस जगप्रसिद्ध असून, त्याची परदेशातही निर्यात होते. नाशिकमध्ये दरवर्षी साधारणत: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंबा दाखल होतो. यंदा मात्र उष्म्यामुळे आंब्याला येणाऱ्या तीन मोहरांपैकी पहिला मोहर गळून पडला. त्यानंतरचे दोन मोहरही म्हणावे तसे आले नाहीत. त्यामुळे हापूसचे उत्पादन मर्यादितच राहिले. परिणामी, सगळीकडेच हापूस पोहोचण्यास उशीर झाला. नाशकात दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणारा हापूस आंबा यंदा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात दाखल झाला असून, त्याचे दर १६० ते २०० रुपये प्रतिकिलो, तर ४०० रुपये डझन असे आहेत. हापूसची आवक मर्यादित राहणार असल्याने भाव उतरण्याची शक्यता कमीच असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यंदा आवक लांबल्याने शहरात दरवर्षी एप्रिलच्या मध्यावर होणारा आंबा महोत्सवही यंदा मेच्या पहिल्या आठवड्यात होत आहे.