पशुधन वाचविणे झाले मुश्कील
By Admin | Updated: May 3, 2016 23:38 IST2016-05-03T23:21:59+5:302016-05-03T23:38:43+5:30
इगतपुरी : जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; दुग्ध व्यावसायिक संकटात

पशुधन वाचविणे झाले मुश्कील
बेलगाव कुऱ्हे : भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावली आहे. दुष्काळाने शेती वाचविणे शेतकऱ्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सूर्य आग ओकत आहे. अनेक ठिकाणी शेतपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे; मात्र त्यांना अपयश येत आहे. साकूर परिसरातील काही शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करीत डाळींब बागा फुलवल्या आहेत.
गेल्या वर्षी त्यांना चांगले उत्पादन मिळाले होते. त्यांचे डाळींब परदेशात विक्र ीसाठी गेले होते. मात्र यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने फळे सुकून गेली आहेत. पाणी न मिळाल्याने डाळींब फळांची उगवण झालेली नाही. यावेळी त्यांना उत्पादन मिळणार नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. पारंपरिक शेतकरी व्यावसायिक दुष्काळाच्या गर्तेत सापडले आहेत. दोन तीन वर्षांत पावसाने शेतकऱ्यांची हवी तशी साथ दिलेली नाही. कधी अवकाळी पाऊस तर कधी पाण्याच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.
कर्जाचा डोंगर त्यांना स्वस्थही बसू देत नाही, अशा स्थितीत जगावे तरी कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनतीने उभी केलेली शेती डोळ्यादेखत नष्ट झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे टॅँकर विकत घेऊन शेती वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरु वात केली असल्याने सर्वच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वातावरणात प्रचंड उष्णता आहे.
सकाळी १० वाजेनंतरच अनेक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायांवरदेखील याचा परिणाम झाला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात शेतीला पूरक असा दुग्धव्यवसाय केला जातो. तोही संकटात येऊ पाहतोय.
परिसरातून हजारो लिटर दुधाचे संकलन केले जाते. सद्यस्थितीत दुधामध्येही मोठी घट निर्माण झाली आहे. उन्हाचा चटका जसा माणसांना बसतो तसा मुक्या जनावरांनादेखील बसतो आहे. पिण्याचे पाणी व चारा नसल्याने जनावरे दूध देखील जास्त देत नाहीत. यामुळे दुग्धव्यवसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत.
इगतपुरी तालुक्याची दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढतच आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटी, मोठी धरणे, नदीपात्र कोरडी पडली आहेत. धरणांच्या तालुक्याला आता भीषण
पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचेच चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांची पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत गोधन वाचविणे कठीण होऊन बसले आहे. (वार्ताहर)