बोगस लाभ घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
By Admin | Updated: June 21, 2014 01:06 IST2014-06-20T22:07:28+5:302014-06-21T01:06:17+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्रिस्तरीय समितीची स्थापना

बोगस लाभ घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
सटाणा : बागलाण तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्रिस्तरीय समितीची स्थापना करण्यात येऊन प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्यानंतरच वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील तसेच ज्या अनुदानित शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांची सखोल चौकशी होऊन खोट्या लाभार्थींची शोधमोहीम राबवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय येथील चिनार या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
चिनार विश्रामगृहावर बागलाणचे आमदार उमाजी बोरसे, प्रांताधिकारी संजय बागडे, तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, तालुका कृषी अधिकारी कापडणीस व तालुका गटविकास अधिकारी कोंदे उपस्थित होते. बागलाण तालुक्यात गत चार महिन्यांत झालेल्या गारपिटीमुळे ५७ हजार शेतकऱ्यांना सुुमारे ६४ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. डांगसौंदाणे, बुंधाटे, वड्याचे पाडे, चाफापाडा, करंजखेडसह अन्य गावांचे चुकीचे पंचनामे झाल्याने अल्प नुकसानभरपाई मिळाली. पिकांच्या नुकसानीप्रमाणे भरपाई मिळावी या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता. यामुळे आज झालेल्या बैठकीत मंडल अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, तलाठी यांची त्रिस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली असून, या परिसरातील शेतावर जाऊन वस्तुस्थिती दर्शक पंचनामे करण्याबरोबरच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात येऊन सदरचे पंचनामे शासनाला सादर करण्यात येऊन अनुदानाची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस कैलास बोरसे, गोपाळ बैरागी, संजय ह्याळीज, श्यामकांत बगडाणे, बाबूराव बागुल, तुकाराम चिंचोरे उपस्थित होते.