गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडणार
By Admin | Updated: November 1, 2015 22:19 IST2015-11-01T22:17:03+5:302015-11-01T22:19:39+5:30
गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडणार

गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडणार
नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी अखेर गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी रविवारी मध्यरात्रीनंतर सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा घेतला आहे. पाण्याचा विसर्ग होणार असल्याने गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांकडून विरोध होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करतानाच विद्युतपुरवठाही खंडित केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने केलेल्या नियोजनानुसार नाशिक व नगर जिल्'ातून सुमारे १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात नाशिक जिल्'ातील गंगापूर तसेच गिरणा खोऱ्यातून ४.३६ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने या निर्णयाला सर्वपक्षीय विरोध झाला, तर नगरच्या पाण्याबाबत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची गेल्या शुक्रवारी (दि.३०) सुनावणी होऊन न्यायालयाने याचिका फेटाळल्या, परंतु जायकवाडीसाठी फक्त पिण्यासाठी पाणी सोडा, असे आदेश दिले. यापूर्वी जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे पाणी पिण्यासाठी व सिंचन तसेच उद्योगासाठी सोडण्यात येणार होते, मात्र न्यायालयाने फक्त पिण्यासाठीच पाणी सोडा, असे सांगितल्यामुळे जायकवाडी धरणात पिण्यासाठी किती पाणी लागेल याचा आढावा घेण्यात येत होता. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक, महावितरण आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार १.३६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, रविवारी मध्यरात्रीनंतर गंगापूर धरणातून ३००० क्यूसेक या दराने (सरासरी ८५०० लिटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग होणार असून, गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही गोदाकाठ परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शिवाय पोलीस बंदोबस्तात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.