१८ हजार नाशिककरांना नियम अन् निर्बंधांचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:09+5:302021-05-10T04:14:09+5:30
______ नाशिक : एकीकडे नाशिक शहर व परिसरात कोरोना थैमान घालत असताना दुसरीकडे मात्र अद्यापही नागरिक नियम अन् निर्बंधांचे ...

१८ हजार नाशिककरांना नियम अन् निर्बंधांचे वावडे
______
नाशिक : एकीकडे नाशिक शहर व परिसरात कोरोना थैमान घालत असताना दुसरीकडे मात्र अद्यापही नागरिक नियम अन् निर्बंधांचे पालन करण्याकडे कानाडोळा करताना दिसून येतात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घालून दिलेले नियम, निर्बंध पायदळी तुडविणाऱ्या १८ हजार १२७ नाशिककरांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मार्चपासून आतापर्यंत तब्बल १ कोटी २ लाख २५ हजार ७०० रुपयांचा दंड पोलिसांकडून वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या साथीला अटकाव करण्याकरिता शासनाने जाहीर केलेली नियमावली आणि निर्बंध नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनाने जसेच्या तसेच लागू केले आहेत. यामध्ये नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्स राखणे, उघड्यावर न थुंकणे, खरेदीकरिता गर्दी न करणे, संचारबंदीचे पालन करणे, अनावश्यकरीत्या घराबाहेर न पडणे, दुकानदारांनी वेळमर्यादा पाळणे, आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे, विनापरवानगी जिल्ह्याबाहेर प्रवास टाळणे आदी नियम व निर्बंधांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमावलीची चोख अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या दरम्यान, काही नागरिक याकडे दुर्लक्ष करून बेशिस्त व बेभानपणे सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस कारवाई करीत आहे.
---इन्फो----
पोलिसांची दंडात्मक कारवाई अशी...
शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत पोलिसांनी नाकाबंदी, फिरती गस्त करून बेशिस्तीवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, आडगाव, म्हसरूळ, पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० हजार ३५० बेशिस्तांवर कारवाई करण्यात आली असून एकूण ५१ लाख २४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वेळमर्यादा, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९ आस्थापनादेखील सील करण्यात आल्या आहेत. तसेच उपनगर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, अंबड, सातपूर, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७ हजार ७७७ लोकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून ५१ लाख ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
-इन्फो--
कारवाई नियमितपणे सुरूच
संचारबंदीकाळात विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ७ ते ११ या वेळेत गर्दी होणाऱ्या काही प्रमुख बाजारपेठेत वाहनांना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांकडून बेशिस्त नागरिकांवर कारवाई सुरू असूनही काही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कारवाई नियमितपणे सुरूच राहणार असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले.