साहित्य संमेलनाला प्रारंभ

By Admin | Updated: January 23, 2016 23:54 IST2016-01-23T23:52:56+5:302016-01-23T23:54:35+5:30

कविसंमेलन : कवींनी मांडल्या भटक्या विमुक्तांच्या जीवन व्यथा

Launch of Literature Convention | साहित्य संमेलनाला प्रारंभ

साहित्य संमेलनाला प्रारंभ

सेनापती तात्या टोपे साहित्यनगरी (येवला) : महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती-जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्था आयोजित भटक्या विमुक्तांच्या नवव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला शनिवार, दि. २३ जानेवारी रोजी येथील आसरा लॉन्सवर उभारण्यात आलेल्या थोर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे साहित्यनगरीत दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला.
या प्रसंगी बोलताना प्रा. वा.ना. आंधळे यांनी भटके विमुक्त अजून मागासलेले असून, अद्याप ते दगडच फोडत आहेत. साहित्यातून त्यांच्या जीवनाला नवी पालवी फुटण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. स्वागताध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी, भटके विमुक्त अजूनही पालातच राहत आहेत. तीन दगडावर संसार मांडला आहे. त्याच्या उत्थानाची खऱ्या अर्थाने गरज आहे. याकरिता संघटना प्रमुखांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
उद्घाटन कार्यक्रमानंतर प्राचार्य वा. ना. आंधळे, संमेलनाध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते, श्रीमती रिता जाधव, संस्थापक तथा निमंत्रक प्राचार्य डी.के. गोसावी, स्वागताध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कविसंमेलनाचे उद्घाटन झाले.
प्रत्येक कवीने आपल्या कवितेमधून भटक्यांचे जीवन, त्यांच्या व्यथा, दशा मांडण्याचा प्रयत्न केला. मन सुन्न करणाऱ्या कवितांनी साहित्यनगरी गहिवरली. मुंबई
पोलीस दलातील महिला कॉस्टेबल रिना जाधव - राठोड यांनी
‘भटक्याची मुलं ही कचरा
कुंडीतली फुलं’ या कवितेतून ‘मुक्त भटके आम्ही भटकंती दाही दिशांची’ अशी सुरुवात करून भटक्यांचा
उघडा संसार आणि त्याची व्यथा मांडली. त्यानंतर प्रा.वा.ना. आंधळे यांनी
आई मला जन्म घेऊ दे,
तू जसे पाहिले जग,
मलादेखील पाहू दे,
नको मारू आई मला
जन्म हा घेऊ दे !!
परमेश्वर प्रत्येकाच्या घरी
जाऊ शकत नाही,
त्याच्या जागी तू
कसे तुला कळत नाही!!
ताईसवे माझ्या मला
आनंदाने न्हाऊ दे,
नको मारू आई मला
जन्म हा घेऊ दे !!
या कवितेतून स्त्री जन्माची कहाणी मांडली, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.
परभणीतील शेलू येथील कवी गौतम सूर्यवंशी यांनी
बापानं परंपरागत तुणतुणं
भूतकाळाच्या झाडाला टांगल्याने
बलुतेदारी तिथेच गेली फासावर
मजुरीचे हिशेब बोटावर
मोजण्याइतका साक्षर
या कवितेतून भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाची व्यथा शब्दबद्ध करत साक्षरतेचा संदेश दिला.
हमाली व्यवसाय करत असलेले श्रीरामपूरचे कवी आनंदा साळवे यांनी
हातात विळा, पोटाला पिळा,
उन्हाच्या प्रहरी,भर दुपारी,
गवताचा भारा डोक्यावरी
माय रानमाळ फिरायची
कधी माय उपाशी पोटी निजायची
या कवितेतून आईने उपाशी पोटी राहून उभ्या केलेल्या संसाराचे वर्णन करत. आता पोराबाळांनी आयुष्याचे सोने करावे, असा संदेश कवितेतून दिला.
त्यानंतर कवी बापू बैरागी यांनी आयुष्याच्या वाटेवरील पडझड थांबवून चूक सुधारून जीवनाचे सोने करण्याची जाणीव कवितेतून करून दिली.
एकापेक्षा एक सरस कवितांनी हे कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.
या संमेलनात भास्कर लगड, अ‍ॅड. सुरेश मोकळ, प्रा. रमेश राठोड, संजय वऱ्हाडे, विष्णू भालेरे यांनी आपापल्या कविता सादर केल्या. स्वागताध्यक्ष आणि उपाध्यक्ष ललिता गोसावी, अरु ण ओतारी या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचलन सरचिटणीस बापू बैरागी यांनी केले. यानंतर सायंकाळी पोट धरून हसवणारा विनोदी कलाकार प्रा. विष्णू भारती (दौंड) यांनी बारा बलुतेदाराचा कालवा हा एकपात्री प्रयोग सादर केला. (वार्ताहर)

Web Title: Launch of Literature Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.