निधीची कमतरता : तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज
By Admin | Updated: May 22, 2016 23:49 IST2016-05-22T23:37:43+5:302016-05-22T23:49:09+5:30
मांजरपाडा प्रकल्पापुढे अडचणींचा डोंगर

निधीची कमतरता : तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज
येवला
दुष्काळी येवला तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या मांजरपाडा-१ प्रकल्पाचे काम सध्या ठप्प झाले आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने ४५४ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता न दिल्याने व मागील शासनाने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटींचे अनुदान प्रशासकीय मान्यतेअभावी अखर्चित राहिल्याने व त्यातीलच २८ कोटींचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पांसाठी वळविल्याने मांजरपाडा १ चा प्रकल्प कधी पूर्ण होणार व येवल्याची तहान कधी भागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
कदाचित या प्रश्नांवर येवले तालुक्यातील जनतेला रस्त्यावर उतरून निधी पदरात पडून घ्यावा लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१४-१५च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे. शिवाय आता सत्तेत असणारे मांजरपाडा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असे म्हणून तत्कालीन परिस्थितीत आघाडी शासनावर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. सत्तेवर आल्यावर मात्र मांजरपाडा बाबत अवाक्षरही बोलत नाहीत. मांजरपाडाबाबत केवळ राजकारण न करता श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवून युती शासनाने या प्रकल्पाची पूर्तता करावी, अशी मागणी तालुका करीत आहे.
जलसंपदामंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मांजरपाडा १ वळण योजनेबद्दल सोईस्कर मौन बाळगले आहे.
आमदार भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटीतून हा प्रश्न मांडला होता. विधिमंडळातही अनेकवेळा प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. परंतु शासनाने तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यास टाळाटाळ केली आहे. शासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे योजनेचा खर्च अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा मांजरपाडा १ हा पहिलाच प्रयोग असून, १४५ कोटी रुपये आजवर खर्च झाला असून, पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्याने काम रेंगाळले आहे. मांजरपाडा वळण योजनेचे सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय ६०६ दलघफू पाणी गोदावरी खोऱ्यात येणार नाही. अर्थातच ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून निघणार नाही. मांजरपाड्याचे पुणेगाव धरणमार्गे डोंगरगावपर्यंत, येवल्यात पाणी कधी येणार, असा प्रश्न तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. या पाण्यातून येवला तालुक्यातील ३५ ल.पा.बंधारे भरून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पुणेगाव ते डोंगरगाव पोहोच कालव्याचे कामही झाले आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम व्हावे, अशी अपेक्षा उत्तरपूर्व भागातील शेतकऱ्यांची व्यक्त केली आहे.
दुष्काळी येवला तालुक्याला पुणेगाव धरणातून दरसवाडीमार्गे डोंगरगाव पोहोच कालव्याद्वारे पाणी हवे असल्यास तालुक्यातील सध्या सुस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मरगळ झटकून सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याची गरज आहे.