कृउबा निवडणूक : भाजपा, सेनेच्या नेत्यांनी फिरवली पाठ
By Admin | Updated: July 6, 2015 00:07 IST2015-07-06T00:05:37+5:302015-07-06T00:07:11+5:30
तिसऱ्या पॅनलची अखेर घोषणा

कृउबा निवडणूक : भाजपा, सेनेच्या नेत्यांनी फिरवली पाठ
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी युतीच्या तिसऱ्या पॅनलसाठी सुरू असलेली धडपड अखेर संपुष्टात आली. भाजपा, सेनेच्या प्रमुख नेत्यांनी या पॅनलकडे पाठ फिरविल्याने भाजपाचे नगरसेवक दिनकर पाटील, आमदार अपूर्व हिरे यांनी वेगळी चूल मांडत ‘परिवर्तन पॅनल’ची घोषणा केली. यामुळे पक्षांतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपा-सेना युतीने स्वतंत्र पॅनल निर्माण करावे, याकरिता नगरसेवक पाटील यांनी स्थानिक नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. याकरिता शासकीय विश्रामगृह येथे तीन बैठकाही पार पडल्या. बैठकांना खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर यांनी हजेरी लावली. मात्र पॅनल जाहीर करण्यास एकाही नेत्याने रस दाखविला नसल्याने अखेर पाटील यांनी आमदार हिरे यांना सोबतीला घेऊन परिवर्तन पॅनलची घोषणा केली. याकरिता पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.
बैठकीला नवनाथ कोठुळे, संजय धात्रक, मधुकर खांडबहाले, रामदास चव्हाण, मनोहर महदे, पांडुरंग आचारी, शांताराम उखाणे, अशोक चव्हाण, ज्ञानेश्वर पाळसे, उत्तम बोेराडे, निशा पगार, सोमनाथ बेंडकोळी, शांताराम मांडे, शिवाजी महाले, धोंडीराम चव्हाण, भाऊराव साळवे, भाऊसाहेब ढिकले, शंकर कसबे उपस्थित होते.
दरम्यान, ‘कृउबा’ला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी पॅनलची निर्मिती केली असून, सोसायटी गट, ग्रामपंचायत गट, व्यापारी गटातील मतदारांचे मतपरिवर्तन करण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास यावेळी बैठकीत व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)