झाडांची हकनाक कत्तल
By Admin | Updated: June 2, 2014 01:20 IST2014-06-01T01:52:11+5:302014-06-02T01:20:11+5:30
मालेगाव : सटाणा नाका येथील चौकाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी अतिक्रमण काढण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी कोपर्यात असलेल्या झाडांची हकनाक कत्तल करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

झाडांची हकनाक कत्तल
मालेगाव : सटाणा नाका येथील चौकाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी अतिक्रमण काढण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी कोपर्यात असलेल्या झाडांची हकनाक कत्तल करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. येथील सटाणा चौकाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. यासाठी येथील अतिक्रमण काढण्यात आले. हे अतिक्रमण काढण्यापूर्वी महानगरपालिकेने कोणतीही नोटीस दिली नसल्याचे अतिक्रमणधारकांचे म्हणणे आहे, तर मनपा अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमणधारकांना नोटीस देण्याची नियमानुसार आवश्यकता नाही. हे अतिक्रमण काढल्यानंतर परिसरात पश्चिमेकडे कोपर्यात असलेले पिंपळाचे डेरेदार तसेच पूर्वेकडील इमारतीजवळील वृक्षाची तोड करण्यात आली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे झाड तोडण्याची गरज नव्हती. राज्यात सर्वत्र बेसुमार वृक्षतोडीमुळे तपमान ४० अंशाच्या पलीकडे गेले आहे. त्यामुळे मनुष्याबरोबरच जीवसृष्टी धोक्यात आलेली असताना सर्वत्र झाडांचे महत्त्व समजू लागल्याने सर्वत्र झाडे लावण्यात येत आहेत. असे असतानाही शहर व परिसरात सर्रास झाडांची कत्तल केली जात असल्याचे वास्तव आहे. सामान्य नागरिकांना स्वमालकीचे झाड तोडण्यास मनाई आहे. मनपा हद्दीत झाडे तोडण्यासाठी सर्वांना मनपाची परवानगी घ्यावी लागते. सामान्य नागरिकांना लावण्यात येणारा न्याय खास लोकांना किंवा संस्थांना लावला जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचे उदाहरण शहरात वनविभागाच्या आवारात विनापरवाना झाडाच्या फांद्या तोडल्या तरीही त्यावर आजपावेतो साधी चौकशी करण्याची तसदीही घेण्यात आली नाही. तसेच येथील कॅम्प रस्त्यावर सार्वजनिक जागेतील डेरेदार वृक्षाची कत्तल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याव्यतिरिक्त काहीही उपाय न योजल्याने हे प्रचंड झाड वाळविण्यात आले तरी मनपाने त्याकडे लक्ष दिले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या नियमानुसार हे झाड तोडण्याच्या बदल्यात पाच नवीन झाडांची लागवड करणे अपेक्षित आहे. हे झाडे तोडण्यासाठी शहरात त्या बदल्यात एकही झाड लावण्यात आलेले नाही. या झाडांच्या बदल्यात आगामी काळात सोयगाव शिवारात मनपा उद्यान तयार करणार असून, त्याठिकाणी झाडे लावण्यात येणार असल्याचे तकलादू कारण संबंधितांनी सांगितले आहे. यावर जनतेचा विश्वास नसून मनपाने येथील पाणी शुद्धीकरण केंद्रात तसेच सटाणा रुग्णालयात असलेल्या शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्या बदल्यात लावण्यात आलेली झाडे कोणती, या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. (वार्ताहर)