वाघाडी नाल्याची झाली कचराकुंडी
By Admin | Updated: May 21, 2014 00:22 IST2014-05-21T00:16:27+5:302014-05-21T00:22:21+5:30
पावसाळ्यापूर्वी नाल्याच्या सफाईची मागणी

वाघाडी नाल्याची झाली कचराकुंडी
पावसाळ्यापूर्वी नाल्याच्या सफाईची मागणी
नाशिक : पंचवटी येथील वाघाडी नाल्यात मोठ्या प्रमाणात केरकचरा साचल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्या वाघाडी नाल्यात मोठ्या प्रमाणात केरकचरा पडलेला असून, परिसरात खाद्यपदार्थ विक्रेते रात्रीच्या वेळी उरलेले तसेच खरकटे अन्न या नाल्यात आणून टाकतात. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते. त्यातच नाल्यात सांडपाणी मिसळले जात असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. नाल्यातील सांडपाणी, केरकचरा यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून, भयावह आजार उद्भवण्याची दाट शक्यता असल्याने पावसाळ्याच्या कालावधीत रोगराई पसरू नये यासाठी प्रशासनाने नाला सफाई मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
वाघाडी नाला स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने सध्या नाल्याला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)