कनाशी आठवडे बाजार ५० दिवसानंतरही पडला ओस
By Admin | Updated: January 9, 2017 01:13 IST2017-01-09T01:13:24+5:302017-01-09T01:13:37+5:30
नोटाबंदी : खर्च करण्यासाठी पैसे नसल्यामुळे ग्राहकांनी फिरविली पाठ

कनाशी आठवडे बाजार ५० दिवसानंतरही पडला ओस
कळवण : शेतमालाला भाव नाही, आठवडे बाजारात भाजीपाला आणला तरी त्याला गिऱ्हाईक नाही, चार बाजार फिरलो तरी पैसा हातात नाही, शेतकऱ्याच्या हातात चलनच राहिलं न्हाई, तर तो बाजारात कसा येईल..? असा अनुभव तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजारात येत आहे़ नोटाबंदीमुळे शेतकरी पुरा हैराण झाला आहे़
कळवण तालुक्यातील कनाशी आठवडे बाजारात बेंदीपाड्याचे भिवराज बागुल, दळवटचे यशवंत पवार, जिरवाड्याचे मधुकर जाधव या आदिवासी शेतकऱ्यांनी व भाजीपाला विक्र ेत्या शामूबाई भोये, कापड विक्र ेते गिरीश मालपुरे, फळ विक्रेते उमेश सोनवणे यांनी आपली उघड नाराजी बोलून दाखविली.
नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण अर्थकारण जैसे थे आहे. कनाशी आठवडे बाजारातील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. नोटाबंदीनंतर ग्रामीण व आदिवासी परिसरात मंदीची लाट कायम आहे, शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण व आदिवासी भागामध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे .
चलनटंचाईमुळे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी ग्राहक तर शेतमाल घेण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आजही ग्रामीण व आदिवासी भागात कायम आहे. तर जे व्यापारी शेतमाल उचलण्यास तयार आहेत, ते दर पाडून शेतमालाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान सोसून शेतमालाची विक्री करताना दिसून येतात .
शेतमालाचा उत्पादन खर्च निघत नाही व निघत असला तरी पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हातात भांडवल राहत नसल्याने पुढील हंगामात उत्पादन कसे घ्यायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. काळा पैसा शोधण्यासाठी मोदी सरकारने घेतलेला निर्णय सामान्य जनतेला वेठीस धरण्यासारखा आहे. नोटाबंदी झाल्यापासून एटीएम बंद तर बॅँकांमध्ये पैसा नाही. बँकेत होणाऱ्या गर्दीला वैतागून एटीएमकडे धाव घ्यावी, असे नागरिकांना वाटत होते. पण ते बंद असल्याने नागरिकांना बँकेत ताटकळत थांबावे लागते. राष्ट्रीयीकृत व जिल्हा बॅँक शाखेतून अल्पप्रमाणात पैसे मिळत आहेत. कधी बँकेकडे कॅश आलीच नाही तर नागरिकांना पैसे मिळत नाहीत. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या शाखेत नागरिकांचे पासबुक ठेवून घेतले जाऊन, दुसऱ्या दिवशी पैसे दिले जात आहे. ५० दिवसांपासून व नंतर कामधंदा सोडून केवळ पैशासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. कधी सुटणार हा काळ्या पैशाचा खेळ? असा सवाल नागरिक करत आहेत.
बँकेत प्रत्यक्षदर्शनी महिलांची गर्दी दिसून आली. या गर्दीत अशिक्षित महिलांसमवेत सुशिक्षित महिलाही उभ्या असल्याच्या दिसून आल्या व त्यांच्यामध्ये पैसे खात्यावर जमा होणार असल्याची चर्चा होती.
यासंदर्भात राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता महिलांच्या जनधन खात्यात खरंच पैसे जमा होणार आहेत का ? अशी विचारणा केली असता त्यांनी शासनाकडून अथवा मुख्य शाखेकडून तशी कसलीही माहिती मिळाली नसल्याने याबाबत आपण अनभिज्ञ आहोत; मात्र महिला मोठ्या प्रमाणात खाते उघडण्यासाठी आमच्या शाखेत येत आहेत. आम्ही त्यांचे जनधन खाते उघडत आहोत, अशी माहिती एका बॅँक अधिकाऱ्याने दिली.
बँकेतून जुन्या नोटा बदलून देणे व स्वीकारणे बंद केल्यानंतर नागरिकांना खात्यातून अधिक नवीन चलन मिळणे अपेक्षित होते. मात्र, काही दिवसांपासून बँकांना नोटांचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने आठवड्याला २४ हजार रुपयेदेखील नागरिकांना खात्यातून काढता येत नाहीत. विविध बँका दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतच रकमेचा पुरवठा करीत असल्याचे चित्र कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात दिसून येत आहे.
एक हजार व पाचश्ो रुपयांच्या नोटाबंदीनंतर दोन महिने उलटूनही पुरेशा नवीन चलनी नोटांचा पुरवठा करण्यात सरकारला अपयश आले असल्याचे चित्र आहे. आता केवळ आठवड्याला प्रत्येक खातेदाराला २४ हजार रु पये काढण्याची मुभा आहे.
मात्र, बँकांना नवीन चलनाचा पुरवठाच होत नसल्याने केंद्र सरकारने ठरवून दिलेली २४ हजार रुपयांची मर्यादादेखील पाळणे शक्य होत नाही. बॅँकांना पैशांची मागणी करु नही पैसेच मिळालेले नाहीत व मिळत नाही त्यामुळे आठवड्याला २४ हजारांऐवजी ग्राहकांना केवळ दोन ते दहा हजार रुपयेच देता येत असल्याची माहिती एका बँकेच्या अधिकाऱ्याने दिली.
बचत खात्यातून २४ व चालू खात्यातून ५० हजार रुपये काढण्यास परवानगी आहे; मात्र सध्या केवळ दोन ते दहा हजार रुपयांपर्यंतच ग्राहकांना रक्कम मिळत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमधून पुरेशी रक्कम मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी बँकेसमोर गोंधळ घालून राष्ट्रीयीकृत बॅँकेला टाळा ठोकण्याचा प्रकार कळवण तालुक्यात घडला आहे. पाचशे, हजारच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपारच्या निर्णयाला दोन महिने झाली तरीही अजून नवीन नोटा मिळविण्यासाठी शेतकरी व सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. नोकरदारवर्गाचा पगार होऊनही खर्चायला पैसे मिळत नाही, दोन दोन तास बॅँकामध्ये पैशांची वाट पहात बसावे लागत आहे. सर्वच व्यवहार स्वाइप मशीनद्वारे शक्य नसल्याने रोख रकमेची आवश्यकता भासत आहे. मात्र, पैशांसाठी एटीएम आणि बँकांपुढे रांगेचा सामना करावा लागत आहे. तासन्तास रांगेत उभे राहूनही हातात दोन हजारांची नोट टेकविली जाते. ही नोट सुटी करायचे म्हणजे मोठे आव्हानच, अशी स्थिती आहे.