जलकुंभ कोसळून दोघी जागीच ठार

By Admin | Updated: October 13, 2015 00:20 IST2015-10-13T00:19:12+5:302015-10-13T00:20:55+5:30

दुर्घटना : सावरगावनजीकची घटना

Jalkumba collapses and killed both on the spot | जलकुंभ कोसळून दोघी जागीच ठार

जलकुंभ कोसळून दोघी जागीच ठार

पिंपळगाव बसवंत : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघींचा अचानक कोसळलेल्या जलकुंभाखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना सावरगावनजीक असलेल्या चमकवाडी या आदिवासी वस्तीत सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. जया दगडू सोनवणे (२७), वनिता खंडू लहानगे (१५) अशी मृतांची नावे आहेत.
निफाड तालुक्यातील सावरगाव येथील केदराई रस्त्यावर सुमारे एक हजार लोकसंख्या असलेली २०० घरांची चमकवाडी ही कष्टकरी आदिवासींची नागरी वस्ती आहे. येथील नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सावरगाव ग्रामपंचायतीने २६ वर्षांपूर्वी जलकुंभ उभारला होता. परंतु कालांतराने या जलकुंभाची योग्य देखभाल, दुरूस्ती झाली नाही व तो जीर्ण झाला होता. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असलेल्या या धोकादायक जलकुंभावर जया दगडू सोनवणे (२७), वनिता खंडू लहानगे (१५) आणि मीना संजय मोरे या तिघी जण कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

त्याचवेळी जलकुंभात पाणी भरले जात होते. पाच हजार क्षमतेचा हा जलकुंभ दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाण्याने काठोकाठ भरला. पाण्याचा भार न पेलवल्याने जीर्ण झालेला सदर जलकुंभ अचानक कोसळला. कपडे धुण्यात मग्न असलेल्या जया सोनवणे आणि वनिता लहानगे या दोघींच्या अंगावर जलकुंभाचा काही भाग कोसळला. जलकुंभाच्या भिंतीत असलेल्या विटांच्या माऱ्याने वनिता दूरवर दगडावर फेकली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जागेवरच तिची प्राणज्योत मालवली. जया सोनवणे या सिमेंटच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाल्या. मात्र मीना मोरे या जलकुंभापासून पाच फूट अंतरावर असल्याने व सावधगिरी बाळगल्याने त्या बचावल्या. वनिताच्या पश्चात आई तर जया सोनवणे यांच्या पश्चात दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. मृतांच्या नातलगांना भरपाई मिळावी अशी मागणी सावरगावचे सरपंच संजय कुशारे यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, पाण्याच्या फुगवट्याने जीर्ण झालेल्या जलकुंभाच्या चारही भिंती एकाचवेळी जमिनदोस्त झाल्या. भिंती कोसळताच जोरदार आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

मंडल अधिकारी आर. बी. बोरसे, विस्तार अधिकारी गादर यांनी घटनेचा पंचनामा केला. पिंपळगाव बसवंत आरोग्य केंद्रात दोघींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जि.प.ने अहवाल मागितलानाशिक : पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघींचा बळी गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी दोन अधिकाऱ्यांचे पथक पाठवून घटनेची चौकशी सुरू केली आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी पाण्याची टाकी कोसळून घडलेल्या दुर्घटनेत दोघींचा बळी गेल्याचे समजताच उपअभियंता पेठकर व शाखा अभियंता दिलीप साळुंखे यांना सावरगाव येथे जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच यासंदर्भात तत्काळ सायंकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचीही सूचना केली. सावरगावला सद्यस्थितीत गावला पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र पाण्याची टाकी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून बांधण्यात आली असून, कुरणवस्ती येथे १९८९ साली महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून सात फूट उंचीचे बैठी

सुमारे आठ हजार लिटर्स पाण्याच्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. या पाण्याच्या टाकीचे बांधकाम संबंधित ग्रामपंचायतीमार्फतच करण्यात आल्याचे प्रकाश नंदनवरे यांनी स्पष्ट केले. तसेच ही पाण्याची टाकी नादुरुस्त किंवा दुरुस्तीविषयक संबंधित ग्रामपंचायतीने कोणताही प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने ही टाकी धोकेदायक असल्याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कळविणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतीने किंवा ग्रामसेवकाने याबाबत काहीही कल्पना दिलेली नाही. पाण्याच्या दाबामुळे ही पाण्याची टाकी फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नंदनवरे यांचे म्हणणे आहे. अहवाल आल्यानंतरच यासंदर्भात काही कारवाई करता येईल काय? हा विचार केला जाईल. तूर्तास जिल्हा परिषदेला या घटनेप्रकरणी थेट कोणावरही कारवाई करता येणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jalkumba collapses and killed both on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.