जयशंकर - तपोवन चौफुली धोकादायक
By Admin | Updated: September 6, 2016 01:19 IST2016-09-06T01:19:29+5:302016-09-06T01:19:45+5:30
अपघाताची भीती : सुसाट धावणाऱ्या वाहनांचा धोका

जयशंकर - तपोवन चौफुली धोकादायक
नाशिक : टाकळी मार्गावरील जयशंकर-तपोवन चौफुली येथून सुसाट वेगाने वाहने जात असल्यामुळे सदर मार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावरून मार्केट कमिटीत जाणाऱ्या पिकअप टाकळी, द्वारकावरील नियमित वाहतूक आणि तपोवनकडे भाविकांच्या वाहनांची वर्दळ सुरू राहते. या वाहनांना जयशंकर-तपोवन चौफुलीवरून जावे लागते. वाहनधारक येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांकडे न बघता सुसाट वेगाने वाहने नेत असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
द्वारकाकडून टाकळी गावात जाण्यासाठी आणि ड्रिमसिटीकडून तपोवनकडे जाण्यासाठी वाहनधारकांना या चौकातून जावे लागते. टाकळी, द्वारका आणि तपोवनकडे जाण्यासाठी हा शॉर्टकटही असल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. पंचवटीत दर्शनासाठी येणारे भाविकही शहराचा प्रवास टाळून टाकळी-तपोवन मार्गाने पंचवटीकडे जात असतात. त्यामुळे भाविक वाहनांचीदेखील वर्दळ सुरू असते. वाळू, दगड वाहून नेणारी चोरटी वाहतूकही याच मार्गावरून होत असते. अलीकडे अवजड वाहनांची वर्दळ या मार्गावरून सुरू असते. त्यामुळे तर धोका अधिकच वाढला आहे. या मार्गावर कुठेही गतिरोधक नसल्यामुळे वाहनधाकरांना रान मोकळे झाले आहे. विशेषत: भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअप व्हॅन चालकांना चौकातून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेता येत नसल्यामुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. सुदैवाने मोठा अपघात घडला नसला तरी वाहनचालकांची बेजबाबदारी आणि गतिरोधक नसल्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. (प्रतिनिधी)