जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे जेलभरो
By Admin | Updated: September 15, 2015 22:51 IST2015-09-15T22:50:56+5:302015-09-15T22:51:37+5:30
कळवण, नांदगाव, सटाणा येथे आंदोलन : चारा डेपो, छावणी व कर्जमाफीची शेतकऱ्यांची मागणी

जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे जेलभरो
कळवण : दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून, सरकारने दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी या मागणीसाठी जिल्हाभरात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
विरोधी पक्षात असताना गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्त्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सध्या फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शेतकरी आत्महत्त्या थांबलेल्या नाहीत. आता फडणवीस हे स्वत:वर खुनाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केला असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करावे, कळवण तालुका दुष्काळी जाहीर करावा, कळवणच्या धरणातील पाणी प्रथम कळवणसाठी आरक्षित करावे आदि मागण्या करून शासनाचे लक्ष वेधले आणि मागण्या मंजूर झाल्या नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जयश्री पवार यांनी कळवण बसस्थानकाजवळ जेल भरो आंदोलनाप्रसंगी दिला.
कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा, वीजबिल माफी करून वीजपुरवठा सुरळीत करावा, कळवण आदिवासी तालुका दुष्काळी जाहीर करावा, शासकीय वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, कळवण तालुक्यातील धरणातील पाणी कळवण तालुक्यासाठी प्रथम आरक्षित करावे, ओतूर धरणासह डोंगरी जयदर, कोसवन, जामशेत ल.पा. प्रकल्पाची कामे तत्काळ सुरू करावीत, कळवण आदिवासी जिल्हा करावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, पक्ष निरीक्षक डॉ. योगेश गोसावी, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, कळवण पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समितीच्या सभापती संगीता ठाकरे, उपसभापती संजय पवार, रायुकॉँ तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, रायुकॉँ जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण बसस्थानकाजवळ जेलभरो आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी ओतूर धरणाचे काम मंजूर असून, निधी उपलब्ध आहे तरी ते बंद आहे. जामशेत, डोंगरी जयदर, कोसवन ल.पा. प्रकल्पाची कामे तत्काळ सुरू करून पाणी आरक्षित करावे, अशी मागणी करून यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, प्रगतिशील शेतकरी घनश्याम पवार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, डी.एम. गायकवाड, विलास रौंदळ यांनी मनोगत व्यक्त करून भाजपा सरकारवर टीका करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली.
नांदगाव : तरीही सरकार अजून विचारच करतंय.. दुष्काळाच्या झळांनी व चुकीच्या धोरणांनी शेतकरी आत्महत्त्येच्या वाटेवर ढकलला जातोय. तरीही सरकार.. असे उद्गार आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेलभरो आंदोलनप्रसंगी काढले. हुतात्मा चौकात पक्षातर्फे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. आमदार पंकज भुजबळ यांच्यासह १५८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन काही वेळाने सोडून देण्यात आले. धरणांमध्ये पाण्याचा मृतसाठा उरला आहे. प्रशासकीय स्तरावर शून्य नियोजन आहे. पुढील आठ महिने कसे जीवन जगायचे हा प्रश्न उभा ठाकलेला आहे. राज्य शासनाने शैक्षणिक फी माफी अशा मागण्या नांदगाव राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. संतोष गुप्ता, मायावती पगारे, साहेबराव पाटील, दिलीप इनामदार, नानाभाऊ शिंंदे, राजाभाऊ पगारे, राजेंद्र आहेर आदिंंनी मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष शैलाताई गायकवाड, सुरक्षा केसकर, रामनिवास कळंत्री, राजेश कवडे, अरुण पाटील, डॉ. सुरेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, शिवाजी पाटील, नीलदादा सोनवणे, डॉ.यशवंत जाधव, किसन जगधने, राजेंद्र लाठे, राजेंद्र नहार, चिंधू माळी, धनंजय कमोदकर, महेंद्र शिरसाठ, डेव्हिड जॉर्ज यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी जेलभरो आंदोलनात भाग घेतला. (वार्ताहर)