पेठ : शेतकऱ्यांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्त्या, वनाधिकार कायद्यानुसार आदिवासींच्या नावावर जमीन करणे, नदीजोड सामजंस्य करार रद्द करावा आदि मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने पेठ येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले़जुन्या बसस्थानकापासून काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व कॉ. इंद्रजित गावित यांनी केले़ यावेळी आंदोलकांनी हातात लाल बावटा घेऊन घोषणा दिल्या़ तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत पेठ तालुका दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, कामगार कायद्यातील कामगारविरोधी धोरणे रद्द करावीत, मनरेगाची कामे सुरू करून मजुरांना ३०० रुपये रोज मिळावा आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले़यावेळी आंदोलकांनी स्वत:ला अटक करून घेण्याची मागणी केली़ त्यामुळे काही काळ पोलीस प्रशासनापुढे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलकांना कसे ताब्यात घ्यावे, असा पेच निर्माण झाला़ एरवी आंदोलकांना अटक करून सोडून देण्याची प्रथा असल्याने यावेळीही तसेच होईल असे वाटत असताना, आंदोलकांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले़ अखेर प्रशासन व आंदोलकांच्या यशस्वी चर्चेनंतर आंदोलकांना अटक करून सुटका देण्यात आली़यावेळी कॉ़ इंद्रजित गावित, जिल्हा सेक्रेटरी लक्ष्मण गायकवाड, चिंतामण गावित, मुनाप तडवी, सुरेश भिवसन, नामदेव मोहाडकर, डॉ़ देवराम गायकवाड, जाकिर मनियार, समीर राजे, अॅड़ दत्तू पाडवी, नगरसेवक जावेद शेख, रवि जाधव, महिला आघाडी प्रमुख गुलबा चौधरी, दुर्गा दरोडे, मुरलीधर जाधव यांच्यासह पेठ तालुक्यातून जवळपास दहा हजारांवर आंदोलनकर्ते सहभागी झाले होते़दिंडोरी : तालुका महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयासमोर सुमारे पाच तास घोषणाबाजी करत जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील मालुसरे, कैलास बलसाने यांच्यासह साडेपाच हजार पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. दिंडोरी येथील तहसील कार्यालयासमोर नाशिक-कळवण राज्यमार्गावर सुमारे चार तास जेलभरो आंदोलन करण्यात आल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.मागण्यांबाबत तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तालुका पातळीवरील समस्या तत्काळ सोडविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रंजवे, वणीचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे बंदोबस्तासाठी उपस्थित होते. (लोकमत ब्युरो)
पेठ, दिंडोरीत किसान सभेचे जेलभरो
By admin | Updated: January 20, 2016 22:17 IST